सावखेडा, ता.रावेर – येथील तरुण शेतकर्याने सोमवारी सव्वा 11 वाजेदरम्यान नारळी दोरी छताला बांधून जीवनयात्रा संपवली. परतीच्या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकरी आर्थिक विवंचनेत असताना, मृत्यू हाच मार्ग सापडत असल्याने, शेतकरी आत्महत्येच्या घटना रावेर तालुक्यासाठी शाप ठरत आहे.
सावखेडा येथील प्रमोद बखाल याने गळफास लावून जीवनयात्रा संपवली. नेहमीप्रमाणे आजही प्रमोद सकाळी लवकर उठला. पत्नी मंगलाशी बोलताना तू शेतात जा, मी नंतर आंघोळ करेल. मुलांच्या शाळेच्या तयारीला पत्नीला मदत करून, पत्नीला शेतात व मुलांना शाळेत रवाना केले.
प्रमोदने जीवन संपण्याचा निर्धार पक्का केला होता.त्याला मुलांचे भविष्य, कुटुंबाचा राहाटगाडा चालवायचा कसा? हा प्रश्न सतत विवंचनेत टाकत होता. घरात एकटा असतानाछताच्या पंख्याला फासाची दोरी लावताना, अचानक लावण्या (प्रमोदची मुलगी) घरी परतली. तिला घरी पाहून प्रमोद थबकला. मात्र, वेळ आणि काळ दोन्ही प्रमोदजवळ आले होते. लावण्या प्रमोदला विचारू लागली, पप्पा तुम्ही काय करताय? तिला पंखा दुरुस्त करतोय, तू परत का आली, असे प्रमोदने विचारले. त्यावर तिने मला शौचास जायचं आहे, असे सांगून गेली. इतक्या वेळात प्रमोदने गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला.
शौच करून आलेल्या लावण्याने हे दृश्य पाहून, तिचे अवसान गळाले. ती पळत बाहेर सुटली. तिने आरोळ्या मारून गल्लीतील माणसं-बायांना बोलवले. संतोष नवले, अशोक चौधरी, विनोद बखाल धावत आले. त्यांनी प्रमोदला लटकलेल्या फासावरून खाली उतरवून थेट ग्रामीण रुग्णालय गाठले. मात्र, तोपर्यंत प्रमोदने दम सोडला होता. डॉ.एन.डी.महाजन यांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर सावदा पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून डॉ.स्वप्नाली पाटील यांना शवविच्छेदन करण्याचे सांगितले. यानंतर सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास सावखेडा येथील स्मशानभूमीत प्रमोद बखाल यांचा 13 वर्षांच्या चंचलने अग्नीडाग देऊन बापाला शेवटचा निरोप दिला.