अहमदनगर – मुळा धरणातून थेट भिंगारला पिण्याचे पाणी देण्याबाबत केंद्र शासन आणि संबंधित कॅन्टोंमेंट बोर्डकरुन सातत्याने चलढकल केली जात आहे. मात्र आताच्या कॅन्टोंमेट निवडणुकीपूर्वी भिंगारला नियमित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी मुळा धरणातून थेट पाणी देण्याचा निर्णय संबंधितांनी न घेतल्यास भिंगारकरांनी मतदानावर बहिष्कार टाकावा, असे आवाहन कॅन्टोंमेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष व भिंगार काँग्रेसचे अध्यक्ष अॅड.आर.आर.पिल्ले यांनी केले आहे. भिंगारला नियमित पाणी मिळावे, याबाबतचा ठराव भिंगार शहर काँग्रेस कमिटीच्या बैठकीत मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शामराव वाघस्कर, अॅड.साहेबराव चौधरी पाटील, सुभाष त्रिमुखे, रिजवान शेख, संजय झोडगे, अनिल परदेशी, संजय खडके, अनिल वराडे, दिपक लोखंडे, लक्ष्मण साखरे, संतोष धीवर, अच्युत गाडे, संतोष ङ्गुलारी, निजाम पठाण, सोपान काका साळूंखे, जालिंदर आळकुटे, आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलतांना अॅड.पिल्ले म्हणाले, भिंगारला पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असून, पाच ते सहा दिवसातून एकदा नळाला पाणी येते. पाण्यासाठी भिंगारकरांवर वणवण भटकंत करण्याची पाळी आली आहे. भिंगारचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी संबंधितांकडे सर्व ताकदीनिशी पाठपुरावा करत असूनही याकडे केंद्र शासन, स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांनी एकमुखी मतदानावर बहिष्कार टाकावा आणि याबाबत सर्व राजकीय, सामजिक संस्था, संघटनांंनी या आंदोलनात सहभागी होवून एकजूट दाखविल्यास केंद्र सरकार या प्रश्नांत गांभिर्याने लक्ष घालून भिंगारच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविला जाईल, अशी अपेक्षा आहे, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
पाच ते सहा दिवसांतून पाणी मिळत असल्याने भिंगारला पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पूर्वी दररोज दोन वेळा भिंगारला पाणी पुरवठा केला जात होता. त्यानंतर दररोज एक वेळ पाणी मिळत होते. मात्र आता 5-6 दिवसांतून पाणी नळाला येते अन् तेही कमी दाबाने असून 15-20 मिनिट पाणी असते. एवढी पाणी टंचाई यापूर्वी नव्हती. वास्तविक स्थानिक कॅन्टोंमेंट बोर्ड प्रशासनाने याची दखल घेऊन नियमित पाणी पुरवठा करायला हवा, मात्र कॅन्टोंमेंट बोर्ड प्रशासन एम.ई.एस.(मिलिटरी इंजिनिअर सर्व्हीस)कडे जबाबदारी दाखवतात.
अन् एमईएस – एमआयडीसीकडे जबाबदारी दर्शवतात. एमआयडीसी प्रशासनाचे म्हणणे आहे की, एमईएस मार्ङ्गत मिलिटरी विभागाचा पाण्याचा कोटा भरुन घेतात व उर्वरित पाणी भिंगारकरांना दिले जाते. त्यासाठी मुळा धरणातून थेट भिंगारला पाणी पुरवठा व्हावा, तसा निर्णय या निवडणुकीपूर्वी घेण्यात यावा, अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकण्याशिवाय भिंगारकरांना पर्याय नाही, असे पिल्ले यांनी म्हटले आहे.