नवी दिल्ली – महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेने भाजपवर गंभीर आरोप केले असताना त्याला भाजपकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदर्शांचं पालन जे करू शकत त्यांना दुसऱ्यांना आदर्श शिकवण्याचा कोणताही अधिकार नाही, असा पलटवार केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी केला. प्रसाद यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला चोरपावलाने देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर कब्जा करायचा होता, असा आरोप करताना जनतेने शिवसेना-भाजप महायुतीला स्पष्ट कौल दिला असतानाही त्याचा अनादर करून शिवसेना कुणाच्या इशाऱ्यावर हे सारं करत होती?, असा सवाल प्रसाद यांनी केला. आम्हाला विरोधी पक्षात बसण्यासाठी जनादेश मिळाला आहे, असे शरद पवार यांनी जाहीरपणे सांगितले होते. काँग्रेसकडूनही तेच सांगितले जात होते. मात्र, अचानक काय झालं कुणाला कळलं नाही. सत्ता मिळवण्यासाठी तिघांनी मिळून मॅच फिक्सिंग सुरू केली, असा आरोप प्रसाद यांनी केला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या मोहापायी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदर्शांचा बळी दिला. आदरणीय बाळासाहेबांनी नेहमीच काँग्रेसचा विरोध केला. त्यांची देशभक्ती आणि राष्ट्रवाद प्रामाणिक होता. याच कारणामुळे भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्र आले होते. दुर्देवाने आज शिवसेनेने सगळे आदर्श बाजूला सारले आहेत. म्हणूनच सत्तेपायी विचारांचा त्याग करणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा कोणताही अधिकार नाही, असे प्रसाद म्हणाले.














