मुंबई – फाटाफुटीचं हे राजकारण मी खूप पाहिलंय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून सरकार स्थापनेचा भाजपचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. त्यांना बहुमत सिद्ध करता येणार नाही. ३० नोव्हेंबरला पुढचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस हे तिन्ही पक्ष पुन्हा एकदा सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करतील,’ असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केलं. पवारांच्या या वक्तव्यामुळं राज्यात येत्या काही दिवसांत बऱ्याच घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचं सरकार येणार असं वाटत असतानाच भाजपनं आज अचानक मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी घडवून आणला. त्यामुळं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. भाजपच्या या राजकारणामुळं धक्का बसलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेची संयुक्त बैठक आज मुंबईत झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. ‘अजित पवार हे आज सकाळी सकाळी राजभवनात गेले आहेत, असं मला सहा वाजता कळलं. महाराष्ट्राच्या राजभवनाची कार्यक्षमता अचानक इतकी वाढल्याबद्दल मला आनंद झाला. मात्र, नंतर सगळ्या घडामोडींचा उलगडा झाला.अजित पवार असं काही करतील हे मलाही वाटलं नव्हतं. भाजपसोबत जाण्याचा त्यांचा निर्णय राष्ट्रवादीच्या धोरणाविरोधात आहे. हा एक प्रकारचा शिस्तभंग आहे. राष्ट्रवादीचा कुठलाही प्रामाणिक कार्यकर्ता भाजपसोबत जाण्याची भूमिका घेणार नाही. महाराष्ट्राचं जनमानस भाजपच्या विरोधात आहे. याची दखल न घेता कुणी निर्णय घेत असेल तर सर्वसामान्य जनता त्यांना पाठिंबा देणार नाही, असं पवार म्हणाले.















