मुंबई- शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी दरम्यानची सत्तास्थापनेची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून महाआघाडीच्या चर्चेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. पाच वर्ष स्थिर आणि पर्यायी सरकार देण्यावर तिन्ही पक्षाचा भर असून आम्ही आज रात्री किंवा उद्या सकाळी सत्तास्थापनेचा दावा करू, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज स्पष्ट केलं.
प्रसारमाध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांनी हे मोठं वक्तव्य केल्याने राज्यातील राजकीय अस्थिरता अवघ्या काही तासांत संपुष्टात येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्याचा आगामी मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत अडीच अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद वाटून घेतलं जाणार आहे का? या प्रश्नावर बोलताना त्यांनी तिन्ही पक्षांसाठी हा मुद्दा महत्त्वाचा नसल्याचं स्पष्ट केलं. सरकार पाच वर्ष चालावं हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. लोकांच्या भावनेचा सन्मान झाला पाहिजे. लवकरात लवकर सरकार स्थापन करणं याला आमचं सर्वाधिक प्राधान्य आहे, असंही ते म्हणाले.
राज्यात स्थिर सरकार देण्यासाठी आज सकाळपासून वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. सध्या वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये तिन्ही पक्षांची बैठक सुरू असून या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित आहेत. राज्यातील सत्तापेचावर या बैठकीत आजच अंतिम फैसला होणार असल्याने राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे.















