अहमदनगर प्रतिनिधी – पथदिवे बंद, रस्त्यावर मोकाट जनावरे अन् कचर्यांच्या ढिगार्यांनी वैतागलेल्या नगरकरांचे प्रतिनिधीत्व करणारे आमदार संग्राम जगताप महापालिका प्रशासनाची उदासिनता अन् मनमानी आता दिसली आहे.
अधिकार्यांना वेळोवेळी सांगूनही महानगरपालिका प्रशासनाचा कारभार नगरकरांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याचा अनुभव आ. जगताप यांनाही आलाय. मनमानी अन् उदासिनता खपवून घेतली जाणार नाही. समस्यांचा निपटारा करण्यासाठी उपाययोजना करा अन्यथा 26 नोव्हेंबरला अधिकार्यांच्या दालनात अभिनव आंदोलन करण्याचा पवित्रा जगताप यांनी घेतला असून तसे पत्र प्रशासन प्रमुख आयुक्तांना आज गुरूवारी दिले आहे.
विधानसभा निवडणूक प्रचाराच्या काळात आमदार संग्राम जगताप यांनी शहर पायाखालून घातले. त्यावेळी त्यांना अनेक समस्या दिसून आल्या. एरव्हीही नगरकर ठिकठिकाणी साचलेला कचरा, बंद पडलेले पथदिवे अन् रस्त्यावरच असलेले मोकाट कुत्रे, जनावरांच्या त्रासाचा सामना करत आहेत. मात्र हा त्रास आता आ.जगताप यांनाही दिसला आहे. त्यामुळेच त्यांनी महापालिकेला पत्र देत सुधारण्याची तंबी दिली आहे.
शहरात स्वच्छता व दैनंदिन सुविधांचा अभाव असल्याचे दिसून आले असून अनेक कॉलनीत कचराच उचलला जात नसल्याकडे जगताप यांनी महापालिकेचे लक्ष वेधले आहे. कचरा उचलला जात नसल्याने त्याच्या दुर्गंधीमुळे साथीचे आजार फैलावले आहेत. रस्त्यावर बसकन मारून बसलेल्या मोकाट जनावरांमुळे वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण झाली आहे. शहरातील 80 टक्के पथदिवे बंद असल्याचेही आ. जगताप यांचे म्हणणे आहे. महापालिकेचा विद्युत विभाग तर प्रमुखांअभावी सूरू आहे. मोकाट कुत्रे आणि बंद पथदिवे यामुळे नगरकरांना जीव मुठीत धरून फिरावे लागत आहेत.
यासंदर्भात आ. जगताप यांनी महापालिका अधिकार्यांना भेटून चर्चा केली आहे. या दरम्यान महानगरपालिका प्रशासनाला लवकरात लवकर हा प्रश्न सोडवण्याचा आदेशही दिला आहे. नाहितर 26 नोव्हेबरला अधिकार्यांच्या दालनात अभिनव आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
अधिकार्यांची भेट घेऊन समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्याचा निपटरा करण्यासाठी सूचनाही केल्या. पण प्रशासनातील अधिकार्यांनी उदासिनतेची भूमिका घेत कोणतीच कार्यवाही केली नाही. आता 26 तारखेपर्यंत उपाययोजना करण्याची संधी दिली आहे. त्यानंतर मात्र आक्रमकपणे अधिकार्यांना वठणीवर आणले जाईल.
– आमदार संग्राम जगताप
मनमानी महागात पडेल
महापालिकेत राष्ट्रवादीच्या टेकूवर भाजपची सत्ता आहे. सत्ताधार्यांचा प्रशासनावर अंकुश नसल्याचे हे द्योतक आहे. महापालिका अधिकार्यांचा मनमानी पध्दतीने कारभार सुरू असल्यावर आ. जगताप यांच्या पत्राने शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र ही मनमानी महागात पडेल. यापुढे ते खपवून घेतले जाणार नाही, या शब्दात आ. जगताप यांनी आपली आक्रमकताही दाखवून दिली आहे. आता प्रशासन सुधारतंय की आ. जगताप यांचा पारा चढतोय याकडे नगरकरांचे लक्ष लागून आहे.
नगरकर साशंक
मोकाट जनावरे ही अनेक दिवसांची समस्या असून मोकाट कुत्र्यांनी चावल्याने अनेकांना दवाखान्याच्या खेटी कराव्या लागल्या. नगरकर महापालिकेला निवेदन देऊन कंटाळले. आता नगरकरांचे प्रतिनिधीत्व करणारे आमदार जगताप यांनी पुढाकार घेतल्याने या समस्या नक्की सुटतील असे नगरकरांना वाटतेय. पण मंदाड अधिकारी अन् मुर्दाड कारभार त्यासाठी सुधारेल काय? यावर नगरकर साशंक आहे.














