जानोरी – प्रतिकूल परिस्थितीतही सक्षम राहण्यात आणि गोड चवीचे उत्पादन देण्यासाठी कॅलिफोर्नियातील ‘आरा’ वाण जगप्रसिध्द आहेत. यातील काळ्या रंगाचा ‘आरा-३२’ हा वाण भारतात नुकताच दाखल झाला आहे. सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या प्रक्षेत्रावर मंगळवारी (ता.१९) या वाणाचे सीडलींग्स आणण्यात आले. ‘सह्याद्री’ने यापुर्वी आयात केलेल्या ‘आरा-१५’चे यशस्वी उत्पादन घेतल्यानंतर ‘आरा ३२’ हे पुढचे महत्वाचे पाऊल मानले जात आहे.
राज्यातील द्राक्ष उत्पादकांना मागील अनेक वर्षांपासून सातत्याने नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीत ही शेतीच संकटात सापडली आहे. ‘आरा’ सारखे जागतिक दर्जाचे वाण अशा प्रतिकूल हवामानातही खात्रीचे आणि दर्जेदार उत्पादन देतात हे आतापर्यंत दिसून आले आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘सह्याद्री’ने या वाणांची आयात करुन द्राक्ष उत्पादकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
निर्यातक्षम ‘आरा’ या जागतिक वाणाचे सर्वाधिक अधिकार ‘सह्याद्री’ सारख्या देशातल्या आघाडीच्या शेतकरी उत्पादक कंपनीला मिळाल्याने केवळ नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातील द्राक्ष उत्पादकांना विशेषत: छोट्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
द्राक्षाच्या सुप्रसिध्द ‘आरा’ या कॅलिफोर्नियातील द्राक्ष वाणांच्या श्रेणीचे भारतातील उत्पादन आणि विक्रीचे सर्वाधिकार १०० टक्के शेतकऱ्यांच्या मालकीची असलेल्या आणि शेतकऱ्यांकडून चालवली जात असलेल्या नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला मिळाले आहेत. शेतकऱ्यांसाठी परदेशातून पेटंटड द्राक्ष वाण आयात करणारी ‘सह्याद्री फार्म’ ही देशातील पहिलीच कंपनी ठरली असून देशाच्या फलोत्पादन नव्हे तर कृषिक्षेत्रातील ही अत्यंत महत्वाची आणि अभिमानास्पद घटना आहे.
सहा खंडांमधील २४ देशांत ‘आरा’ जातीची द्राक्षे उत्पादित केली जातात. भारताचा समावेश आता या देशांमध्ये झाला आहे. भारतातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेत आपले स्थान अधिक भक्कम करण्यास ‘आरा’ वाणांमुळे फायदा होणार आहे. या पेटंटेड ‘आरा’ टेबल ग्रेप्सच्या (खाण्याची द्राक्षे) व्हाईट, रेड आणि ब्लॅक या तीन प्रकारांत एकाहून एक सरस अशा निर्यातक्षम जाती आहेत.
द्राक्षामधील जागतिक पायाभूत सुविधा आणि जागतिक बाजारपेठेचा फायदा मिळणे ‘सह्याद्री’मुळे शेतकऱ्यांच्या आवाक्यात आले आहे. द्राक्षे उत्पादन आणि विक्रीत महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. ‘आरा’ वाणांमुळे आगामी काळात राज्याच्या आणि अर्थातच ‘ग्रेप कॅपिटल’ समजल्या जाणाऱ्या नाशिकच्या द्राक्ष उत्पादन क्षेत्रात क्रांतिकारी बदल अपेक्षित आहेत.
सह्याद्रीने या आधी आयात केलेल्या पेटंटेड आरा १५ या वाणांची प्रक्षेत्र चाचणीनंतर शेतकऱ्यांच्या शेतात ४० हेक्टरवर यशस्वी लागवड झाली आहे. २०२० पर्यंत सह्याद्री ‘आरा’चे सर्व वाण निर्यातीसाठी शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देणार आहे. २०२३ पर्यंत लागवडीखालील क्षेत्र २ हजार हेक्टरपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे.















