नवी दिल्ली- गांधी कुटुंबीयांना देण्यात आलेली स्पेशल प्रोटेक्शन फोर्स (एसपीजी) सुरक्षा काढून घेण्याच्या विरोधात काँग्रेसच्या खासदारांनी लोकसभेत हंगामा केला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचे कामकाज सुरू होत असतानाच काँग्रेसच्या खासदारांनी घोषणाबाजी करत सभापतींच्या आसनाकडे धाव घेतली. या नंतर डीएमकेचे खासदार देखील काँग्रेसच्या खासदारांना पाठिंबा दर्शवत सभात्याग केला. सभात्यागापूर्वी बदल्याचे ‘राजकारण बंद करा’,. ‘एसपीजीचे राजकारण बंद करा’ आणि ‘आम्हाला न्याय हवा’ अशा घोषणा दिल्या.
केंद्र सरकारने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षाआणि माजी अध्यक्ष राहुल गांधी, तसेच पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी यांना देण्यात आलेली एसपीजी सुरक्षा काढून घेतली. आता या नेत्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर सोनिया गांधी,राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या बंगल्यांवरील एसपीजी सुरक्षा हटवण्यात आली आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या २१ मे १९९१ रोजी झालेल्या हत्येनंतर गांधी कुटुंबीयांना एसपीजी सुरक्षा देण्यात आली होती.














