
मुंबई: दिल्लीतील ‘फडणवीस-शहा भेट’ आणि ‘शरद पवार-सोनिया गांधी’ भेटीनंतर राज्याच्या राजकारणाला वेगळे वळण मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना शिवसेनेचे प्रवक्ते आणि संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री फक्त शिवसेनेचा होणार असे सूचक वक्तव्य केले आहे. ‘ही सत्याची लढाई असून, विजय आमचाच होईल. राज्याचा निर्णय राज्यातच होणार’, असे सांगताना, ‘राज्याचा चेहरा आता बदलत असून मुख्यमंत्री फक्त शिवसेनेचाच होणार’, अशा शब्दात राज्यात शिवसेनेचेच सरकार येणार असल्याचा ठाम विश्वास राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. लवकरच नव्या सरकारचा शपथग्रहण सोहळा होणार असून शपथग्रहण ही कुणाची मक्तेदारी नाही, ग्रहण लागले आहे ते आता सुटणार आहे, असे सांगत राऊत यांनी नाव न घेता भारतीय जनता पक्षाला टोला लगावला आहे. लवकरच राज्याच नवे सरकार स्थापन होईल आणि ते सरकार राज्यातील जनतेच्या मनाप्रमाणे स्थापन होईल, त्यानंतर राज्याचा चेहरामोहराच बदलणार असल्याचेही पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना राऊत म्हणाले.