जळगाव : शिंदे-फडणवीस सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यात गिरीश महाजनांनी देखील कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचे आज पहिल्यांदा जळगाव जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी ढोलताशाचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, जोरदार घोषणाबाजी अशा वातावरणात कार्यकर्त्यांकडून महाजनांचं जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर महाजनांची चांगलाच ठेका धरला.
यावेळी महाजनांनी विविध विषयांवर भाष्य केलं. महाजन म्हणाले की, लवकरच कामाला सुरुवात करुन अडीच वर्षाचा बॅकलॉग भरुन काढायचा आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकासाला गती मिळेल. चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी राज्यात अधिक बळकट होईल, असा दावाही महाजन यांनी केलाय.
‘खडसेंना खूप अपेक्षा होती की, मी मंत्री होईन, संत्री होईन, पण..’
तसंच पंकजा मुंडे कुठेही नाराज नाहीत. आज सकाळी त्या माझ्याशी बोलल्या. तसेच 16 ऑगस्टला आम्ही भेटणार आहोत, अशी माहिती महाजनांनी दिलीय. महाजन यांनी पुन्हा एकदा एकनाथ खडसेंवरही निशाणा साधला. एकनाथ खडसे यांना सध्या दुसरं कुठलं काम राहिलं नाही. टीका करणं हे एकमेव काम सध्या त्यांच्याकडे आहे. खडसेंना खूप अपेक्षा होती की, मी मंत्री होईन, संत्री होईन, पण ते काहीच झाले नाहीत. विरोधी पक्षनेता होईल असंही त्यांना वाटलं होतं पण तेही झाले नाहीत, असा टोला महाजनांची खडसेंना लगावलाय.