मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे चक्रीवादळ होण्याची शक्यता आहे. हे वादळ सुरुवातीला आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर ओडिशात इशारा जारी करण्यात आला आहे.
मात्र, या वादळाचा कोणताही थेट परिणाम महाराष्ट्रावर जाणवण्याची शक्यात नाही. त्यामुळे राज्यात वाढलेल्या तापमानानं घामाघूम झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार नाहीय. यादरम्यान, तापमानात अधिक वाढ होईल, असा अंदात वर्तवला जातोय. विदर्भापाठोपाठच पुण्यातही तापमान जवळपास चाळीशीपर्यंत टेकलंय. शनिवारी पुण्यात 39 .6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्रात सूर्य आग ओकतोय. तर विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे.
वादळाचा परिणान शून्य…
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ आकार घेतंय. रविवारी संध्याकाळपर्यंत हे वादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीला हे वादळ धडकण्याची दाट शक्यता आहे.