गेवराई प्रतिनिधी | सध्या पैसे घेऊन लग्न करून मुलांची फसवणूक होत असल्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. अशातच दोन लाख रुपये घेतल्यानंतर नवरीसह तिच्या नातेवाइकांनी लग्नासाठी होकार दिल्याने वराकडील लाेकांनी स्वखर्चाने लग्न पार पाडले. पण लग्नाच्या आठ दिवसानंतर माहेरी गेलेली नवरी ‘नॉट रिचेबल असून तिचा मोबाईल फोने देखील बंद आहे. फसवणूक झाली असलयाचे कळताच नवरदेवाने पोलिसात धाव घेत नवरीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तिचा यापूर्वीच विवाह झालेला असून तिला दोन अपत्ये असल्याची माहिती कळताच सासरच्या लोकांना धक्का बसला.
गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथील कृष्णा अशोक फरताळे या तरुणाला रामकिसन जगन्नाथ तापडिया (रा. सालवडगाव, ता. शेवगाव, जि. अहमदनगर) या व्यक्तीने औरंगाबाद येथील एका मुलीचे स्थळ आणले होते. नवरी मुलगी रेखा चौधरी व इतर चार जणांनी दोन लाख रुपये देत असाल तर लग्न करू, अशी सहमती दर्शविली. त्यानंतर नवरीकडील मंडळींना रोख ६० हजार रुपये व १ लाख ४० हजार रुपयांचा धनादेश दिला.
गेवराई तालुक्यातील बोरीपिंपळगाव फाट्यावरील एका मंगल कार्यालयात २० जुलै २०२१ रोजी लग्न झाले. दिलेला धनादेश आठ दिवसांत बँकेत विड्राॅल होताच नवरी मुलगी रेखा माहेरी गेली. त्यांनतर वेगवेगळी कारणे देत ती परत सासरी आलीच नाही. काही दिवसांनंतर तिचा मोबाइल बंद झाला. दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मध्यस्थी रामकिसन जगन्नाथ तापडिया यांना संपर्क साधला कोठे तक्रार द्यायची ते करा म्हणत फोन कट केला. त्यानंतर फरताळे यांच्या तक्रारीवरून संतोष शिंदे, सुनीता चौधरी, रेखा चौधरी (तिघे रा. जाधववाडी, औरंगाबाद सिडको), रामकिसन तापडिया (रा. सालवडगाव, ता. शेवगाव, जि.नगर) व विठ्ठल पवार (रा.सावरखेडा) या पाच जणांविरुद्ध गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पो.कॉ. साजेद सिद्दिकी करत आहेत.