मुंबई : दोन वर्षांनंतर राज्य कोरोनमुक्त झाले असून उद्या गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात येत आहे. तसेच मास्कमुक्ती करण्याचा निर्णयही घेतला आहे. मास्क घालणं हे बंधनकारक नाही तर ऐच्छिक असणार आहे. यासोबतच राज्यातील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठीही आरोग्यमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केली आहे.
काय म्हणाले आरोग्यमंत्री?
आज आरोग्य विभागात वय वर्षे 40 ते वय वर्षे 50 या वयोगटातील जेवढे शासकीय कर्मचारी आहेत ते साधारणत: 22 लाखांच्या आसपास आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांसाठी दोन वर्षांत एकदा पाच हजार रुपयांच्या मर्यादेपर्यंत आपण त्यांना ज्याकाही आवश्यक चाचण्या असतील, निरोगी राहण्यासाठी आवश्यक किंवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण या सर्व चाचण्या करण्याची मान्यता दिली आहे. त्यासाठी जवळपास 105 कोटी रुपये खर्च येतो. 50 ते 60 आणि निवृत्तीपर्यंतच्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी अशाप्रकारच्या चाचण्या करुन घेणं बंधनकारक केलं आहे. या दोन्हींचा मिळून 105 कोटी रुपयांचा खर्च शासकीय कर्मचाऱ्यांच्या दृष्टीकोनातून करण्यात येत आहे.