पुणेः राज्यातील काही नेत्यांचे फोन टॅप झाल्याचे प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अधिकाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातील नेत्यांचे फोन टॅप होत होते. हे मी स्वतः पाहिलं आहे. फडणवीस असताना या घटना घडल्या, मात्र त्याची किंमत आता अधिकाऱ्यांना चुकवावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. मंत्र्यांच्या सत्तेसाठीच्या स्पर्धेची किंमत अधिकाऱ्यांना चुकवावी लागेल, असा अप्रत्यक्ष इशारा शरद पवार यांनी दिला.
फोन टॅप केल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुकताच त्यांच्या चौकशीचा अहवाल आला असून या प्रकरणी त्या दोषी आढळल्या आहेत. दोषी आढळल्यानंतर त्यांच्या विरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर रश्मी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता उच्च न्यायालयानं त्यांच्यावर 25 मार्चपर्यंत कठोर कारवाई करू नका, असा सूचना दिल्या आहेत. त्या काळात काँग्रेस नेते नाना पटोले, संजय काकडे, आशिष देशमुख, बच्चू कडू यांचे फोन टॅप करण्यात आले होते.
गोव्यातही फोन टॅपिंगचा आरोप
दरम्यान, गोव्यातदेखील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोन टॅप केले जात आहेत, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते म्हणाले, ‘ज्या राज्यात निवडणुका आहेत त्या ठिकाणी फोन टॅपिंगचा महाराष्ट्र पॅटर्न राबवला जात आहे. काँग्रेस नेते आमि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनीही फोन टॅप होत असल्याची भीती व्यक्त केली होती. मी म्हटलं फक्त सुदीन ढवळीकर आणि विजय सरदेसाई हे प्रमुख पक्षांचे नेते आहेत. त्यांचेही फोन टॅप होत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.