नवी दिल्ली : गोवा आणि उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांची भाजपसोबत आमचं काय नळावरचं भांडण आहे का? आम्ही नेहमी विरोधच करावं, असं नाही नाही. त्यांच्या काही चांगल्या गोष्टी आम्ही घ्याव्यात, आमच्या चांगल्या गोष्टी त्यांनी घ्याव्यात, असं वक्तव्य केलं. या वक्तव्यावरून अनेकांचा भुवया उंचावल्या आहेत.
भाजपच्या (Bhartiya Janata Party) प्रत्येक गोष्टीला विरोधाला विरोध आम्ही करणार नाहीत, त्यांचं आणि आमचं काही नळावरचं भांडण आहे का? असा सवाल खासदार राऊत यांनी केला. त्यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यातील दुरावलेले संबंध हे काही कायमचे नाहीत, असेच सूतोवाच संजय राऊत यांनीच केले आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
गोवा आणि उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, भाजपने जाहीरनामा जाहीर केला असेल, त्यातल्या काही चांगल्या गोष्टी असतील तर आम्ही त्याचे स्वागतच करू. भारतीय जनता पक्षाशी आमचं काही नळावरचं भांडण नाहीये. राज्यासाठी, राष्ट्रासाठी त्यांनी काही चांगली पावलं उचलण्याचं मान्य केलं असेल तर नक्कीच त्यातल्या काही गोष्टी आम्हीसुद्धा घेऊत, आमच्या काही गोष्टी त्यांनीही घ्याव्यात.
सोमय्यांनी कोर्टात जावं- राऊत
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्यासाठी शिवसेना जबाबदार आहे, असे आरोप केले जात आहेत. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असेल त्यांनी न्यायालयात जावं. कायदा आहे. कायद्यानुसार कारवाई होत असते. एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांच्यावरील हल्ल्याचा शिवसेनेने निषेध केला आहे. अशा गोष्टींवर कायद्यानुसार कारवाई होते. उगाच आरोपांची आणि अफवांची राळ उठवून चालत नाही. कुणावरही हल्ला झाला असेल तर कायदा काम करत असतो. कुणीही सुटत नाही. न्यायालयांचे मालक आम्ही नाहीत. कोण आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे.