माजलगाव/दिंद्रुड प्रतिनिधी | तीन दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवरदेवाने सत्यनारायणाचा कार्यक्रम झाल्यांनतर दुपारी जेवणानंतर शेतात आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथे घडली. पांडुरंग रामकिसन डाके (२६) असे मृताचे नाव आहे. ही घटना सोमवारी उघडकीस आली.
पांडुरंग डाके याचे शनिवारी माजलगावात लग्न झाले. सोमवारी सकाळी १० च्या सुमारास घरी सत्यनारायणदेखील झाला. पूजेनंतर पाहुणेे व गावातील लोक घरी जेवण करत होते. पांडुरंग डाके हा जेवण करून दुपारी तीन वाजता कोणालाही न सांगता शेताकडे गेला व त्याने आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. त्याचे प्रेत झाडाला लटकलेल्या अवस्थेत शेजाऱ्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी त्यांच्या घरी माहिती दिली. पांडुरंगने आत्महत्या का केली याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही.