मुंबई : राज्यात पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यांत वेगळ्या ठिकाणी ३०-४० किमी/ताशी वेगाने वादळी वाऱ्यासह मध्यम ते तीव्र पाऊस पडेल. कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, पालघरमध्ये पुढील ३-४ तासात पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहेत. त्यामुळे नागरिकांनी बाहेर जाताना खबरदारी घ्यावी अशी माहिती आयएमडी मुंबईकडून देण्यात आली आहे.
काल झालेल्या मुसळधार पावसात अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यामुळे नुकसान झालं आहे. तर अनेक ठिकाणी वीज पडल्याची घटना घडली आहे. येत्या चार दिवसात मुसळधार पावसाचा इशारा कालच देण्यात आला होता. राज्यात पुढील 4 दिवस सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलं आहे.
दरम्यान,आज जळगाव जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. काल जिल्ह्यातील विविध ठिकाणी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामुळे शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.