भुसावळ : रेल्वेत गार्ड म्हणून नोकरीस असलेल्या 31 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शहरातील प्रल्हाद नगरात शनिवारी रात्री उघडकीस आली. तीन दिवसांपूर्वीच तरुणाने गळफास घेतल्याचा अंदाज आहे तर तरुणाने नेमकी आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नाही. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
अनिलकुमार रमासिस सिंग (31, प्लॉट नंबर 16, गुर्जर कॉलनी, प्रल्हाद नगर, भुसावळ, मूळ रा.शिवनाथपूर, शिगीया, विभूतीपूर, जि.समस्तीपूर, बिहार) असे मयत रेल्वे गार्डचे नाव आहे. ते शहरातील प्रल्हाद नगरात अवघ्या सहा दिवसांपूर्वीच कैलास महाजन यांच्या घरात सिंग हे भाड्याने रहावयास आले होते. दरम्यान, त्यांनी घरातील लोखंडी आसारीला गळफास घेऊन आत्महत्या केली.
शनिवारी सिंग यांच्या परीवारातील सदस्यांनी फोन करून सांगितलेे की, सिंग हे फोन उचलत नाही म्हणून रेल्वेतील त्यांच्या मित्रांनी घरात जावून पाहिले जात असता आतून दरवाजा लावला असल्याने पाठीमागील बाजूने दरवाजा तोडून पाहिला असता अनिलकुमार सिंग यांनी किचनमधील लोखंडी आसारीला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. मृतदेह कुजल्याने दुर्गंधी येत असल्याचे सिंग यांनी तीन दिवसांपूर्वीच आत्महत्या केली असल्याचा अंदाज आहे. त्यांनी आत्महत्या का केली ? याचे ठोस कारण कळू शकले नाही.
याबाबत घर मालक कैलास महाजन यांच्या खबरीनुसार बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, मयत सिंग यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परीवार आहे.