चाळीसगाव प्रतिनिधी | चाळीसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे रविवारी आगमन झाले. यानिमित्त २०० पेक्षा अधिक जणांचा जनसमुदाय एकत्र येणार नाही, अशी अट असतानाही चार ते पाच हजार नागरिक एकत्र आले. त्यामुळे मिरवणूक परवानगीच्या अटी, शर्तीचा भंग केल्याच्या कारणावरून खासदार, आमदार, नगराध्यक्षा, माजी आमदार व पुतळा आगमन समिती सदस्य अशा १७ जणांसह इतर अनोळखी ४ ते ५ हजार जणांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
कोरोना काळात शासनाने अनेक निर्बंध लादले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी २४ सप्टेंबर ते ८ अाॅक्टोबरपर्यंत जळगाव जिल्ह्यात पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांचा जमाव एकत्र येण्यास, पूर्वपरवानगीशिवाय मिरवणूक व सभा घेण्यास प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आगमनानिमित्त मिरवणुकीची परवानगी देताना २०० पेक्षा अधिक जनसमुदाय एकत्र येणार नाही, या अटीवर परवानगी देण्यात आली होती. तसेच नियमांविरुद्ध कोणतेही कृत्य करू नये अशी नोटीस कलम १४९ प्रमाणे बजावली होती. मात्र, अटी-शर्तीचे उल्लंघन झाल्याने गुन्हा दाखल झाला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक व्ही.व्ही. अाव्हाड करत आहेत.
समितीच्या सदस्यांसह पाच हजार जणांना धरले दोषी
पुतळा आगमन समितीचे सदस्य घृष्णेश्वर पाटील, खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, माजी आमदार राजीव देशमुख, नगरसेवक राजेंद्र चौधरी, संजय रतनसिंग पाटील, श्याम देशमुख, भगवान पाटील, शेखर देशमुख, जगदीश चौधरी, रामचंद्र जाधव, पं.स. सदस्य संजय पाटील, रमेश चव्हाण, सूर्यकांत ठाकूर, नितीन पाटील, सदानंद चौधरी या १७ जणांसह इतर अनोळखी ४ ते ५ हजार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.