नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट होताना दिसत होतं, मात्र आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढली आहे.
गेल्या 24 तासात नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 2 हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात देशात 27 हजार 176 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 284 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे.
गेल्या 24 तासात देशात 38 हजार 12 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 33 लाख 16 हजार 755 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 25 लाख 22 हजार 171 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 43 हजार 497 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 3 लाख 51 हजार 87 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 75 कोटी 89 लाख 12 हजार 277 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.