मुंबई: ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वच राजकीय पक्षांची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप करत माझ्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार असेल तर राजीनामा देतो, असं मोठं विधान मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांना टार्गेट केलं आहे. वडेट्टीवार यांनी विरोधकांच्या टीकेला पलटवार दिला आहे. पाच जिल्ह्यात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होत आहेत. याला काँग्रेस जबाबदार नाही. याला भाजपच जबाबदार आहे. हे त्यांनी मान्य करावं. महाविकास आघाडी ओबीसी आरक्षण जाण्यास जबाबदार असल्याचं त्यांना वाटत असेल तर ते जनतेची दिशाभूल करत आहेत. ओबीसींच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे. तत्कालीन सरकारने पाठवलेले ते सहा पत्रं त्याचा पुरावा आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.
ओबीसींच्या आधी रिक्त असलेल्या जागांवर ओबीसी उमेदवार द्यावा ही सर्वांची भूमिका आहे. आम्हीही घोषणा केली आहे. हे करून उद्या जर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचा प्रश्न निर्माण झाला तर तिथे ओबीसी कॅटेगिरीतीलच माणूस हवा. तुम्हाला ती जागा रिझर्व्ह हवी तरच अध्यक्ष होईल. पण अध्यक्ष करताना अडचण येणार नाही, असं सांगतानाच परंतु सर्वांनीच ठरवल्याने उद्या ओबीसी विरुद्ध ओबीसी अशीच निवडणूक होणार आहे. ओबीसी विरुद्ध ओपन होणार नाही. आता या पाच जिल्ह्याच्या मुद्द्यावरून जे काही राजकीय आकांडतांडव सुरू आहे ते केवळ राजकीय फायदा मिळवण्यासाठी सुरू आहे. त्यापलिकडे काही नाही. महाराष्ट्रातील जनता योग्य निर्णय घेईल. त्यावरून कळेल कुणाची चूक आहे, असा दावाही त्यांनी केला.