मुंबई : विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ आमदारांसाठीच्या यादीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख, माजी खासदार राजू शेट्टी यांचे नाव वगळल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांच्या जागी राष्ट्रवादीने हेमंत टकले यांचे नाव दिल्याचे सांगितले जात आहे. याबाबत राजू शेट्टी यांनी नाराजी जाहीर केली असून मी देखील करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीला दिला आहे.
राजू शेट्टी म्हणाले, लोकसभा निवडणुकीपूर्वी आमच्यात एक समझोता झाला होता. तो पाळायचा किंवा धारदार खंजीर खुपसायचा हे राष्ट्रवादीने ठरवायचं आहे. आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही काय त्यांच्या दारात भीक मागायला गेलो नव्हतो. त्यामुळे काही झालं तरी मला आमदार करा नाहीतर जीव सोडणार असं माझं म्हणणं नाही आहे.
ते पुढे म्हणाले, स्वाभिमानी संघटनेसाठी किंवा पक्षासाठी विधानपरिषद हे काही आमचं साध्य नाही किंवा ते नाही मिळालं तर आम्ही किंवा आमच्यातील काही दहा-वीस लोक आत्महत्या करतील असा काही नाही.गेल्या अडीच वर्षांपासून मी कोणत्याच पदावर नाही. म्हणून काय लोकांच्या मनातील स्थान कोणी हिरावून घेऊ शकत नाही,” असं राजू शेट्टी यांनी यावेळी म्हटलं. करेक्ट कार्यक्रमाच्या पुढे एक करेक्ट कार्यक्रम असतो तो मी करेन असा इशाराही यावेळी त्यांनी दिला