मुंबई/जळगाव : राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. काल राज्याच्या बऱ्याच भागांत जोरदार पावसाने हजेरी लावलीय. आता आजही राज्यांतल्या काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या वतीने उत्तर महाराष्ट्रात यलो तर विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात मागील गेल्या १५ ते २० दिवसापासून पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आले होता. परंतु राज्यात पावसाने पुन्हा कमबॅक केल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. जिल्ह्यात मागील गेल्या ३ दिवसापासून पावसाने हजेरी लावली आहे. गिरणा व मन्याड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे या दोन्ही प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. जवळपास १ हजार क्युसेक अावक धरणात हाेत असल्याने गिरणा धरणाच्या पाणीसाठ्यात २ टक्के वाढ झाली आहे. तसेच रात्री उशिरा हतनूर धरणाचे आठ दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे तापीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
दरम्यान, हवामान विभागाने आज ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. तर उर्वरित जिल्ह्यांत पावसाचा जोर कमी राहील. आज मुंबई, ठाणे, धुळे, नंदूरबार, जळगाव जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नाशिक, पालघर, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.