जळगाव- बहुचर्चित जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री सुरेश जैन यांना सात वर्षांची शिक्षा आणि १०० कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांनाही ५ वर्षांची शिक्षा आणि ५ लाखाचा दंड ठोठावण्यात आला. तर माफीच्या साक्षीदार सिंधू विजय कोल्हे यांची याप्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. धुळे जिल्हा न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.
धुळे जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीश सृष्टी नीलकंठ यांनी घरकुल घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री सुरेश जैन, माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांच्यासह ४८ आरोपींना दोषी ठरवले होते. त्यानंतर आज सायंकाळी या आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली. घरकुल घोटाळ्याप्रकरणी धुळे न्यायालयाने सुरेश जैन यांना ७ वर्षाची शिक्षा आणि १०० कोटींचा दंड ठोठावला आहे. गुलाबराव देवकर यांना ५ वर्षाची शिक्षा आणि ५ लाखाचा दंड, बिल्डर जगन्नाथ वाणी, राजेंद्र मयुर यांना ७ वर्षाची शिक्षा आणि ४० कोटीचा दंड आणि प्रदीप रायसोनीला ५ वर्षाची शिक्षा आणि १० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
काय आहे हा घोटाळा
‘घरकुल योजना’ ही जळगाव नगरपालिकेची योजना होती.
झोपडपट्टीत राहणाऱ्यांना स्वस्त दरात चांगली घरे देण्यासाठी आणि झोपडपट्टी निर्मूलनाच्या उद्देशाने ही योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
१९९९मध्ये हरी विठ्ठलनगर, खंडेरावनगर, समतानगर आणि तांबापुरा या ठिकाणी सुमारे ११० कोटींचे कर्ज काढून ११ हजार घरकुले बांधण्याच्या कामास सुरुवात झाली होती.
मात्र २००१मध्ये या योजनेत घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं होतं
ज्या जागेवर घरकुल बांधण्यात आले होते, ती जागाही पालिकेच्या मालकीची नसल्याचं उघड झालं होतं
अनियमितता, कायद्याचे उल्लंघन, मनमानी पद्धतीने निर्णय, गैरव्यवहारही उघडकीस आले होते
सत्ताधाऱ्यांनी मर्जीतील खानदेश बिल्डर्सला हे काम दिले. त्याला नियमबाह्य पद्धतीने सुमारे २९ कोटी रुपये बिनव्याजी आणि आगाऊ दिले होते
ठेकेदाराने वेळेत ही घरे बांधून दिली नाही, तरीही त्याच्यावर कारवाई करण्यात आली नव्हती
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या ही बाब लक्षात आल्यावर ३ फेब्रुवारी २००६ रोजी शहर पोलीस ठाण्यात घरकुल योजनेत २९ कोटी ५९ लाख नऊ हजार रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार नोंदवली होती