जळगाव, (प्रतिनिधी) -भाई हिराचंद रायसोनी पतसंस्था प्रकरणी जळगावात आर्थिक गुन्हे शाखेने धाडी टाकत कारवाई केली असून याप्रकरणी चौकशी सुरु असल्याने अधिक बोलत नाही मात्र चौकशी संपल्यावर पत्रकार परिषद घेऊन बीएचआर संदर्भातील शासनाकडे केलेल्या तक्रारीचा संपूर्ण पत्रव्यवहार देणार असून या संस्थेच्या प्रॉपर्टी मातीमोल भावात घेतलेल्या आमदार, खासदार, माजी मंत्री यांचं रेकॉर्ड देखील आहे ते पण देणार असल्याचं माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी ‘नजरकैद’ शी बोलतांना सांगितले.
एकनाथ खडसे यांना आपली बीएचआर प्रकरणी शासनाकडे तक्रारी आहे का याबाबत विचारणा केली असता खडसे म्हणाले की गेल्या तीन वर्षांपासून तक्रारी केल्या आहेत. खा. रक्षाताई खडसे यांच्या लेटरहेडवर सुद्धा दिल्लीला तक्रारी केल्या आहे. त्यासोबतच वकील कीर्ती पाटील यांनी देखील तक्रारी केल्या होत्या. जवळपास सोळा ते सतरा तक्रारी होत्या असं खडसे यांनी सांगितलं.
गेल्या सरकारनं कारवाई थांबवून ठेवली होती
मात्र गेल्या सरकारनं कारवाई थांबवून ठेवली होती असा आरोपही फडणवीस सरकारचं नावं न घेता खडसे यांनी यावेळी केला आहे.
एक दोन दिवसात आर्थिक गुन्हे शाखेची चौकशी संपल्यावर एकनाथ खडसे सर्व रेकॉर्ड देणार असल्याचं सांगत असल्याने आता कुणाची नावं समोर याचीच उत्सुकता असणार आहे.
हा घोटाळा काही हजार कोटींचा असल्याचं बोललं जात आहे. सहकार विभागाने केलेल्या चौकशीत एकट्या पुणे शाखेतच १६०० कोटींचा घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले होते. राजकारणी आणि अधिकारी यांचे काळा पैसा दडवण्याचे केंद्र,कोट्यावधी रुपयांचे बेनामी व्यवहार, अनेक कायदे आणि नियम यांचे सर्रास उल्लंघन असे अनेक गैरप्रकार केल्याचे आरोप या पतसंस्थेवर आहेत . भाई हिराचंद रायसोनी ही मल्टीस्टेट पतसंस्था असल्याने आणि मल्टीस्टेट क्रेडीट को – ऑपरेटिव्ह सोसायटीज् कायदा २००२ प्रमाणे अशा संस्थावर कारवाईचे अधिकार केंद्र सरकारला असल्याने महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त या पतसंस्थेवर कारवाई मात्र करू शकत नव्हते त्यामुळं सहकार आयुक्तांनी हा चौकशी अहवाल केंद्र सरकारला पाठवला होता.
बँकेच्या भागधारकांची आणि ठेविदारांची फसवणूक आहे. त्यामुळेच या धाडसत्रा नंतर अनेक राजकारण्यांचे आणि अधिका-यांचे धाबे दणाणले असावे.आता हे प्रकरण तडीस जाते की राजकीय साठमारीचा बळी ठरते हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल.