लातूर – चॉकलेटसाठी वडिलांकडे पैसे मागणाऱ्या अवघ्या चार वर्षांच्या मुलीचा स्वतःच्याच वडिलांनी गळा घोटून जीव घेतल्याची संतापजनक घटना लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील भीमा तांडा येथे घडली आहे. आरोपी बाळाजी राठोड याने आपल्या मुलीचा निर्दयपणे खून केल्याने परिसरात खळबळ उडवली आहे.
ही घटना रविवारी सकाळी २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. मृत चिमुरडीचे नाव आकांक्षा बाळाजी राठोड (वय ४) असे आहे. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी बाळाजी राठोडला अटक केली आहे.
घटनेचा तपशील :
२९ जून रोजी सकाळी बाळाजी राठोडचा पत्नीशी वाद झाला होता. नंतर तो मुलीसह गावातील शेतात गेला. आकांक्षाने त्याच्याकडे चॉकलेटसाठी पैसे मागितले, परंतु मद्यधुंद अवस्थेत असलेल्या बाळाजीने संतापून तिचाच गळा घोटून खून केला.
खून केल्यानंतर त्याने मृतदेह तसाच झुडपात टाकून दिला. संध्याकाळपर्यंत मुलगी परत न आल्याने आईने शोधाशोध सुरू केली. बाळाजीला विचारले असता त्याने सुरुवातीला काहीही माहिती नसल्याचे सांगितले. मात्र पोलिसांच्या तपासात त्याने खूनाची कबुली दिली.
मदतीऐवजी मृत्यू :
एका लहानशा चिमुकलीला फक्त चॉकलेट हवे होते. पण तिच्या छोट्याशा मागणीनेच तिचा आयुष्याचा शेवट झाला. आरोपी बाळाजीच्या या कृत्यामुळे संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे.
पोलिसांचा तपास सुरू :
पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे. शवविच्छेदनासाठी आकांक्षाच्या मृतदेहाला रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.