बहाळ येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे दिमाखात उद्घाटन
बहाळ – आताची जीवनपद्धती, राहणीमान, शिक्षणपद्धती खूप बदलली आहे. तंत्रज्ञान व डिजिटल एज्युकेशन चा वापर वाढल्याने शिक्षण घेणे अधिक सोपे झाले असले तरी आव्हाने मात्र त्यापेक्षा जास्त वाढली आहेत. प्रत्येक क्षेत्रात विज्ञान – तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने जर नवीन पिढी त्यात अज्ञानी राहिली तर भारताचे भविष्य अंधारात जाईल. म्हणून आजच्या आधुनिक युगात विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासाठी नवनवीन संकल्पनांवर आधारित विज्ञान प्रदर्शन ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले. ते बहाळ येथे माध्यमिक विद्यालयात आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
मंचावर प्रदर्शनाचे उद्घाटक म्हणून खासदार उन्मेशदादा पाटील,कार्यक्रमाच्या अध्यक्ष पं.स.सभापती सौ.स्मितलताई दिनेश बोरसे, उपसभापती संजय पाटील, नगराध्यक्षा सौ.आशालताताई विश्वास चव्हाण, मार्केट सभापती सरदारशेठ राजपूत, न.पा.गटनेते संजय रतनसिंग पाटील, नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, जि.प.सदस्या सौ.मंगलताई भाऊसाहेब जाधव, सौ.मोहिनी अनिल गायकवाड, माजी पं स सदस्य दिनेशभाऊ बोरसे, पं.स.सदस्य सुभाष पैलवान, पियुष साळुंखे, सुनील पाटील, दत्तू मोरे, भाजपा तालुका उपाध्यक्ष कपिल पाटील, गटशिक्षणाधिकारी विलास भोई, विस्तार अधिकारी जितेंद्र महाजन, रा.वि.संचालक सुधीर आबा पाटील, मार्केट संचालक मच्छिंद्रभाऊ राठोड, सौ.अलकनंदाताई भवर, नगरसेवक बापू अहिरे, नगरसेविका सौ.विजया प्रकाश पवार, सौ.विजया भिकन पवार, नमोताई राठोड, मुख्याध्यापक अशोक देवरे, पर्यवेक्षक वाय.आर.सोनवणे, माजी नगरसेवक निलेश महाराज, कैलास पाटील बहाळ गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रा.प. सदस्य. विकासो चेअरमन, व्हा.चेअरमन, तालुकाभरातील विज्ञान शिक्षक आदी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध प्रयोगांची पाहणी मान्यवरांनी केली व नाविन्यपूर्ण प्रयोग सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली. विज्ञान प्रदर्शनाच्या प्रसंगी खासदार उन्मेष दादा पाटील यांनी आर्टिफिशिएल इंटेलिजन्स ही येणाऱ्या काळातील संकल्पना असून त्यावर विद्यार्थ्यानी जास्तीत जास्त भर द्यावा असे सांगितले.
उपस्थित विद्यार्थ्यांसमोर मनोगत व्यक्त करताना आमदार मंगेश चव्हाण यांनी विविध किस्से, अनुभव व उदाहरणे सांगत मनमोकळा संवाद साधला.
2012 मध्ये माझे शिक्षक माळी सर यांच्या नावाने कॉम्प्युटर लॅब माझ्या हिंगोणे गावात सुरू केली होती, मागील वर्षभरात आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने चाळीसगाव तालुक्यातील 10 हुन अधिक शाळांना मिनी सायन्स लॅब भेट दिल्या, या सायन्स लॅबमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत होत आहे. भविष्यकाळात तालुकास्तरावर भव्य – दिव्य प्रमाणात विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन देखील आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी दिले. आजच्या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर अश्या प्रदर्शनांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात भाग घेणे गरजेचे आहेच सोबत शिस्त, प्रामाणिकता व कष्ट घेण्याची ताकत देखील तितकीच महत्वाची आहे असं मी मानतो.
थोर गणिततज्ञ भास्कराचार्य व जगप्रसिद्ध छायाचित्रकार कलामहर्षी केकी मुस यांची कर्मभूमी असा आपला चाळीसगाव तालुका. गणित आणि विज्ञानाची मोठी परंपरा या तालुक्याला आहे, तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती असेल किंवा नसेल पण अंतराळ संशोधकांच्या रांगेत चाळीसगावची स्वीटी पाटे जगातील एकमेव अशी महिला होती जिने स्ट्रॅटोस-२ प्लस या रॉकेट संशोधनात मोलाचा वाटा उचलला होता. युरोपीयन विद्यापीठाच्या एअरोस्पेस अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या ४० जणांच्या टीमने हे रॉकेट विकसित केले होते, विशेष म्हणजे त्यात स्वीटी एकमेव महिला होती. अस म्हटलं जातं की मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थी असतो, घडणाऱ्या सर्व बऱ्या वाईट प्रसंगातून तो शिकत असतो. मात्र अस जरी असलं तरी प्रत्येक विद्यार्थी हा आपल्या शालेय जीवनात कसा शिकला, कुठे शिकला, कोणत्या शिक्षकांच्या हातून त्यांचे शिक्षण झाले यावरसुद्धा त्याचे भवितव्य अवलंबून असते असे सांगताना त्यांनी संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी शिक्षकांचे असलेले महत्व अधोरेखित केले.
शिक्षण घेत असताना घरची परिस्थिती अतिशय बेताची असल्याने वडिलांना आधार म्हणून मी मोटार रिपेअरिंग, लाईट फिटिंग आदी कामे केली, 10 वी 12 वी चाळीसगाव येथे कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्यानंतर जळगाव येथे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग ला माझा नंबर लागला, मात्र शिक्षण घेण्याची परिस्थिती नसल्याने अर्धवट शिक्षण सोडून मला नाईलाजाने उद्योग व्यवसायात उतरावे लागले, सांगण्याचा उद्देश एकच की मी आज जो काही घडलो आहे ते केवळ आणि केवळ मला शालेय जीवनात मिळालेले शिक्षण, आईवडील आणि गुरुजनांचे संस्कार यामुळेच शक्य झालं आहे, आई वडिलांनी कष्टाने, हात न पसरता घाम गाळून स्वाभिमानाने जगण्याचे संस्कार दिले तर माझ्या शाळेतील शिक्षकांनी मला प्रामाणिकता व शिस्तीचे धडे दिले म्हणूनच मी आज इथवर पोहचू शकलो, प्रखर इच्छाशक्ती असेल तर आपण कोणत्याही अडचणींवर मात करू शकतो याची काही मोजकी उदाहरणे आमदार मंगेश चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना दिली. प्रास्ताविक ए.एन.देवरे यांनी केले. सूत्रसंचालन मोरे सर व दिनेशभाऊ बोरसे यांनी केले.