जळगाव – महाविद्यालयात होणारे सांस्कृतिक उपक्रम शिक्षणाबरोबर बाहेरील जगाचे परिपूर्ण ज्ञान देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात, विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यामध्ये त्यांना विशेष महत्त्व आहे. महाविद्यालयात जसे विद्यार्थी घडतात तसे सांस्कृतिक उपक्रमातून कलाकार घडत जातात. त्यामुळे व्यक्तिमत्त्व विकासाचा आणि कलाकार घडवण्याचा कारखाना म्हणून त्याकडे पाहण्याची गरज आहे, असे मत ‘रायसोनी महाविध्यालया’च्या ‘कट्टय़ावरची गोलमेज’ या अनौपचारिक चर्चासत्रात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
महाविद्यालयाच्या पहिल्या सेमिस्टर परीक्षांनंतरच्या सुटय़ांमध्ये विद्यार्थ्यांना प्रतीक्षा असते ती नवीन सेमिस्टरची. कॉलेजमधील नवीन शैक्षणिक वर्षांत काय करायचे, कशाकशात भाग घ्यायचा, काय टाळायचे याची गणितं मुलामुलींमध्ये येता-जाता, हिंडताफिरता होणाऱ्या गप्पांमधून आखली जात असतात. विद्यार्थ्यांची अशी मते त्यांच्याच प्रमाणे नवीन शैक्षणिक सत्रातील घडामोडींबाबत उत्सुक असलेल्या अन्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावीत, या हेतूने रायसोनी महाविध्यालयाच्या “ड्रामा क्लबच्या” माध्यमातून ‘कट्टय़ावरची गोलमेज’ हे चर्चासत्र भरवण्यात येत आहेत.
याअंतर्गत झालेल्या पहिल्या ‘गोलमेज’मध्ये महाविद्यालयांतील सांस्कृतिक जीवनावर गप्पा झाल्या. तसेच शहादा येथे होणाऱ्या युवक महोत्सवाचा यावेळी आढावा घेण्यात आला, रायसोनी व्यवस्थापन महाविद्यालयाचे साक्षी उरयानी, आरती थावराणी, राहुल शर्मा, निखील पोपटानी, यश पाटील, उनीत तेजकर, स्नेहा सावंत हे विद्यार्थी या चर्चासत्रात सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्याबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास आणि पुढे जाऊन त्यांच्या करिअरसाठी महत्त्वाचे ठरणारे सांस्कृतिक उपक्रम आणि महोत्सव महाविद्यालयांनी अधिक अग्रक्रमाने साजरे करण्याची गरज आहे, असा सूरही त्यांनी आळवला. सदर उपक्रमाला रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांचे मार्गदर्शन लाभत आहे.