मुंबई – महाराष्ट्राकडे असलेले केंद्र सरकारचे ४० हजार कोटी परत करण्यासाठी देवेंद्र फडणवीस तीन दिवसांचे मुख्यमंत्री झाले होते, हा खासदार अनंतकुमार हेगडे यांचा दावा फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला आहे. ‘हे सगळं धादांत खोटं आहे. महाराष्ट्राचा एकही पैसा केंद्राला परत केलेला नाही,’ असं त्यांनी म्हटलं आहे.
शिवेसना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाआघाडीला रोखण्यासाठी फडणवीस यांनी अजित पवारांच्या मदतीनं सरकार स्थापण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो सपशेल अपयशी ठरला. अजित पवारांनी माघार घेतल्यानं अवघ्या ८० तासांत फडणवीसांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळं विरोधकांकडून त्यांची ‘तीन दिवसांचे मुख्यमंत्री’ म्हणून खिल्ली उडवली जात आहे. तीन दिवसांच्या या मुख्यमंत्रिपदाचं रहस्य कर्नाटकमधील भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांनी नुकतंच उघड केलं. ‘महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात असलेले केंद्राचे ४० हजार कोटी परत करण्यासाठीच फडणवीस हे तीन दिवसांचे मुख्यमंत्री झाले होते,’ असा दावा त्यांनी केला होता. त्यांचं हे वक्तव्य सर्वत्र व्हायरल झालं आहे. भाजपच्या खासदारानंच हा दावा केल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.