नवी दिल्ली – येत्या ०६ डिसेंबरला वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली. भारताचा सलामीवीर आणि शिखर धवनला डच्चू देण्यात आला असून त्याच्या जागी संजू यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे.
शिखर सध्या गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील एका सामन्यात झेल पकडताना त्याच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्याच्या गुडघ्याला तब्बल २० टाके घालावे लागले आहेत. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने मंगळवारी त्याची फिटनेस टेस्ट केली. धवन पूर्ण बरा होण्यासाठी आणखी काही वेळ लागणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. डॉक्टरांच्या अहवालानंतर त्याला टी-२० मालिकेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला असून संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे.
संजू सॅमसनला बांगलादेश विरुद्धच्या टी-२० मालिकेतही संधी देण्यात आली होती. मात्र, अंतिम संघात त्याला स्थान मिळू शकले नव्हते. पुढील महिन्यात भारत व वेस्ट इंडिजमध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. यातील पहिला सामना ६ डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये होणार आहे. दुसरा सामना ८ डिसेंबरला तिरुवअनंतपुरममध्ये तर, अखेरचा सामना ११ डिसेंबरला मुंबईत खेळवला जाणार आहे.
असा असेल टी-२० मालिकेसाठी संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, संजू सॅमसन.