मुंबई – देवेंद्र फडणवीस हे गेल्या ४७ वर्षात पाच वर्षांची कारकीर्द पूर्ण करणारे महाराष्ट्राच्या इतिहासातील फक्त दुसरे मुख्यमंत्री ठरले. पण आता त्यांच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. दुसऱ्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस हे फक्त तीन दिवसांचे मुख्यमंत्री ठरले. शपथविधीनंतर ७२ तासातच फडणवीसांना राजीनामा देण्याची वेळ ओढावली. यापूर्वी महाराष्ट्राच्या इतिहासात फक्त वसंतराव नाईक यांनीच फक्त पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता.
१९६० ला महाराष्ट्र वेगळा झाल्यानंतर आतापर्यंत २७ मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. यापैकी २७ वे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फक्त तीन दिवसांचे मुख्यमंत्री ठरले. यापैकी शरद पवार हे चार वेळा, वसंतराव नाईक आणि वसंतदादा पाटील प्रत्येकी तीन वेळा, शंकरराव चव्हाण आणि विलासराव देशमुख यांनी प्रत्येकी दोन वेळा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
महाराष्ट्राच्या तिसऱ्या विधानसभेत म्हणजेच १९६७ ते १९७२ या काळात वसंतराव नाईक यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता. महाराष्ट्राचा सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा मानही वसंतराव नाईक यांच्याच नावावर आहे. ते पहिल्यांदा १९६३ ला मुख्यमंत्री बनले. वसंतराव नाईक यांनी ११ वर्ष म्हणजे १९७५ पर्यंत राज्याचं नेतृत्त्व केलं. यानंतर शंकरराव चव्हाण यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली.