मुंबईः उत्तरेतील बर्फवृष्टी, उत्तर आणि वायव्य दिशेदरम्यान येणारे वारे याच्या परिणामामुळे राज्यातील तापमानाचा पारा खाली उतरत असून गारठा वाढला आहे. दरम्यान, राज्यात पुढील दोन दिवस थंडीचा जोर वाढणार आहे.
१८ जानेवारीपर्यंत कोकणातील चार जिल्हे तसेच उत्तर महाराष्ट्रात आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या काही भागात थंडीचा प्रभाव अधिक वाढण्याचा अंदाज आहे. राज्यामध्ये उर्वरित ठिकाणी सध्या थंडीचा प्रभाव अधिक नाही. मध्य भारतात प्रभावित असलेल्या उच्च दाबाच्या प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यांच्या परीघ क्षेत्र महाराष्ट्रात दक्षिणेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंडीला काहीसा अडथळा निर्माण झाला आहे.
त्यामुळे या भागात थंडीची तीव्रता फारशी वाढलेली नाही, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान १७ ते २० जानेवारी या कालावधीत राज्यातील काही भागांमध्ये हलक्या पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
पुणे, नाशिक, धुळे, जळगावमध्ये पारा १० अंश सेल्सिअसपर्यंत जाणाच्या हवामानाचा अंदाज आहे. तर, मुंबईत १५ ते १७ जानेवारीदरम्यान थंडीची लाट येणार आहे.