नवी दिल्ली : मागील गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न पेटला आहे. दरम्यान, यावरून आज महाराष्ट्र व कर्नाटक यांच्या मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी शहा यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद समन्वयातून सोडवावा, अशी सूचना दिल्या आहेत. तसेच दोन्ही राज्यांकडून तीन-तीन मंत्र्यांची समिती नेमून प्रत्यक्ष सीमाभागातील समस्यांचा अभ्यास करून त्या सोडवाव्यात, असे निर्देशही अमित शहा यांनी दिल्या.
केंद्रीय गृहमंत्री यांनी दिलेल्या निर्देशांवर महाराष्ट्र लवकरच अंमलबजावणी करणार असल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह यांनी या प्रकरणात संवेदनशीलपणा दाखवून मध्यस्थी केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले.
केंद्रीय गृहमंत्री यांनी संसद परिसरातील ग्रंथालयात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांच्यासमवेत बैठक घेतली. बैठकीनंतर श्री. शाह यांनी माध्यमांशी संवाद साधला.
श्री. शाह पुढे म्हणाले, सीमावाद प्रश्न हा संवैधानिकरित्या सोडविला पाहिजे. सीमावाद प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अंतिम निकाल लागेपर्यंत आरोप – प्रत्यारोप करु नयेत. दोन्ही राज्यांनी तीन-तीन मंत्री नेमून ज्या भागात सीमावादावरून तणाव आहे, त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन अभ्यास करावा. यासह कायदा सुव्यवस्था नीट राहावी यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत समिती नेमावी.
हे सुद्धा वाचा..
मध्य रेल्वेच्या भुसावळसह येथे तब्बल 2422 जागांसाठी बंपर भरती, 10वी पाससाठी मोठी संधी..
ग्राहकांसाठी खुशखबर! चांदी तब्बल 1500 रुपयांनी तर सोनं 500 रुपयांनी स्वस्त, लगेचच चेक करा नवीन दर
आंतरधर्मीय लग्न करण्याच्या तयारीत असाल तर सावधान.. याबाबत राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय…
पुढील काही तासात राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार ; जळगाव कशी आहे पावसाची स्थिती?
सीमावादावर अलीकडच्या काही दिवसात सामाजिक माध्यमांतून गैरसमज पसरविण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न केला जात आहे. विशेषत: फेक (बनावट) ट्विटरच्या माध्यमातून अधिक प्रमाणात गैरसमज पसरविले गेले आहेत. यापुढे अशा फेक ट्विटर खात्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे श्री. शाह माध्यमांशी बोलताना म्हणाले.
सर्व राजकीय पक्षांनी सीमावादाचा प्रश्न चिघळणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे विनंतीपूर्वक आवाहन केंद्रीय गृहमंत्री यांनी यावेळी केले.