नवी दिल्ली : जगभरात कोळसा टंचाईमुळे औष्णिक उर्जा प्रकल्प संकटात सापडले आहे. त्यामुळे जगातील अनेक देशांना वीजेच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. यावर पर्यायी उपाय म्हणून विविध प्रयोग केले जात आहेत. भारत सरकार देखील अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करण्यास प्रोत्साहन देत आहे. त्यादृष्टीने शास्त्रज्ञांच्या टीमला मोठे यश मिळाले आहे. भूगर्भातील उष्ण पाण्यापासून वीजनिर्मितीचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. या ऐतिहासिक प्रयोगामुळे जगातील भू-औष्णिक ऊर्जा तयार करणाऱ्या देशांच्या यादीत भारताचाही समावेश होणार आहे.
भू-औष्णिक स्रोतातून वीजनिर्मिती करणाऱ्या देशांमध्ये अमेरिका, आयलॅंड, फिलिपिन्स, इंडोनेशिया व मेक्सिकोचा समावेश आहे. यासह न्यूझिलॅंड, इटली, तुर्की, एल साल्वादोर, केनिया या देशांचाही समावेश आहे. आयलॅंडमध्ये 90 टक्के गरज भू-औष्णिक ऊर्जेने भागविली जाते. त्यामुळे भारतात हा प्रकल्प साकारल्यास वीज पुरवठ्याची समस्या सुटणार आहे. दिल्ली येथे श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेत डॉ. मनमोहन कुमार व डॉ. भूपेश शर्मा यांच्या नेतृत्वात पायलट प्रोजेक्ट राबविण्यात आला.
5 किलोवॅट वीजनिर्मिती
संस्थेचे वैज्ञानिक भूपेश शर्मा यांनी यानी दिलेल्या माहितीनुसार, जीएसआय आणि ओएनजीसीच्या संशोधकांनी आपल्या देशात भूगर्भातून उष्ण पाण्याचे झरे निघणारी 100 पेक्षा अधिक ठिकाणे शोधली आहेत. ही स्थळे ऊर्जेचे मोठे स्रोत आहेत, पण बिनकामी पडले आहेत. त्या उष्ण पाण्याच्या नैसर्गिक स्रोताद्वारे वीजनिर्मिती होऊ शकते, ही दिशा भारतीय भू-सर्वेक्षण (जीएसआय), नागपूरचे संचालक व भूवैज्ञानिक डॉ. विशाल साखरे व त्यांच्या टीमने दाखविली आणि ती भू-औष्णिक ऊर्जा निर्मितीसाठी महत्त्वाची ठरली. वैज्ञानिकांनी तीन वर्षांच्या अथक प्रयत्नांतून 5 किलोवॅट वीजनिर्मितीचा प्रयोग यशस्वी केला.
मेट्रो सिटीची विजेची गरज भागणार
पाण्याचा उष्णांक बिंदू (बॉइलिंग पॉइंट) 100 डिग्री असतो. मात्र वैज्ञानिकांनी 65 ते 70 डिग्री उष्ण पाण्यातून वीजनिर्मिती केली. या उष्ण झऱ्यातून उष्णता (हीट) बाहेर काढण्यात आली. टर्बाईनमध्ये या उष्णतेसोबत एक विशिष्ट लिक्विडमिश्रित करून त्याद्वारे वाफ तयार करण्यात आली. ही वाफ पुन्हा लिक्विडमध्ये परिवर्तीत करण्यात आली. हे चक्र सतत सुरू ठेवत वीजनिर्मिती करण्यात आली. देशातील विविध स्रोतांमधून 15 हजार मेगावॅटपेक्षा अधिक वीजनिर्मिती करून मुंबई, दिल्लीसारख्या शहरांची वर्षभराची विजेची गरज पूर्ण केली जाऊ शकते, असा विश्वास भूपेश शर्मा यांनी दिला.