नवी दिल्ली – संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्रातील सत्तापेचावर बोलण्यास काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नकार दिला आहे. ‘नो कमेंट्स’ असं उत्तर त्यांनी आज याबाबतच्या प्रश्नावर दिलं आहे. डिसेंबरच्या आधी महाराष्ट्रात नवं सरकार येईल, असा विश्वास शिवसेना व्यक्त करत असताना सोनियांनी बाळगलेल्या या मौनामुळं सस्पेन्स वाढला आहे.
भाजपला दूर ठेवून महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत. त्यासाठी आघाडीच्या नेत्यांच्या बैठकाही सुरू आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत अनेकदा जाहीर भाष्य केलं आहे. मात्र, काँग्रेसच्या हायकमांड सोनिया गांधी यांनी अद्याप कोणतंही जाहीर वक्तव्य केलेलं नाही. खरंतर काँग्रेसचा निर्णय होत नसल्यामुळंच सत्तास्थापनेला उशीर होत असल्याचं बोललं जात आहे.
हिवाळी अधिवेशनासाठी लोकसभेत जात असताना पत्रकारांनी सोनियांना गाठून महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत नेमकं काय चाललं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सोनियांनी त्यावर ‘नो कमेंट्स’ इतकेच उत्तर दिले.