
विधानसभा निवडणुकांमध्ये झुंज देऊन अपयशी ठरलेल्या उमेदवारांशी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात संवाद साधला. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते. ‘अनेकांना निवडणुकीत यश आलं नाही. त्याला बरीच कारणं आहेत. आपली साधनसामग्री कमी पडली. सत्ताधाऱ्यांकडे दिल्ली व राज्याची जबरदस्त ताकद होती. त्यामुळे आपल्याला पराभव पत्करावा लागला. जे जिंकले त्यांनी आवाक्याबाहेर मेहनत केली आणि विजय मिळवला,’ असं पवार म्हणाले.
अनेक ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकदिलानं लढले. निवडणुकीच्या काळात तरूण पिढीची साथ आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळाली. अल्पसंख्याक समाजानेही आपल्याला साथ दिली. काही झाले तरी भाजपला निवडून आणायचे नाही अशी मनस्थिती होती, असं त्यांनी सांगितलं. अनेकांनी ‘वंचित’ने नुकसान केल्याचे सांगितले. समाजातील गरीब वर्ग ‘वंचित’च्या माध्यमातून संघटित झाला आहे. आंबेडकरांना मानणारा हा वर्ग आहे. आतापर्यंत हा वर्ग आपल्या सोबतच होता. काही कारणाने हा समाज आपल्यापासून दुरावला गेला. हा समाज आपल्यासोबत कसा येईल त्यासाठी आपल्याला काम करावे लागेल, असं आवाहन त्यांनी नेत्यांना केलं.