मुंबई : राज्यात मागील दोन महिन्यापासून कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात होती. परंतु गेल्या काही दिवसापासून नव्या बाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. राज्यातील सध्याची कोरोना रुग्णसंख्या वाढ हे चौथ्या लाटेचेच संकेत आहेत.
दरम्यान अशात राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील कोरोना परिस्थिती आणि निर्बंधांबाबत भाष्य केलं. तूर्तास तरी मास्क सक्ती नाही, मात्र कोरोनाची रुग्णसंख्या वाढली तर मास्क सक्तीचा आणि निर्बंधांचा निर्णय घ्यावा लागेल, असं वक्तव्य मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं.
राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आठ दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्यामध्ये झपाट्याने वाढ झाल्याचं दिसत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात 1 हजार 494 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी राज्यात 1357 नव्या रुग्णांची नोंद झाली होती.
दरम्यान आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील कोविड परिस्थितीवर चर्चा जरुर होईल, मात्र निर्बंधांबाबतचा विषय सध्या तरी अजेंडावर नाही, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. परंतु नागरिकांनी मास्क घालावेत. ही स्वयंशिस्त लोकांनीच पाळावी, असं आवाहनही त्यांनी केलं.