- वाघूरचे पाणी आणून सिंचनासह पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लावणार
पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघाला ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक,, भौगोलिक महत्त्व असून गिरणा, तितुर, गडद, हिवरा, बहुळा ,अग्नावती या नद्यांचा संपन्न किनारा लाभलेला आहे. असे असताना हा मतदारसंघ केवळ पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहात आला असून दुष्काळाचे चटके सोसत आला आहे. शेती, शेतकरी, शेतमजूर ,कामगार ,नोकरदार, व्यापारी, उद्योजक, बेरोजगार यांच्या समस्या व प्रश्न कमी होण्याऐवजी वाढत असल्याने या मतदारसंघाचे पूर्वीचे वैभव डागाळले जात आहे. सहकारी संस्था डबघाईला आल्या आहेत या संस्था वाचविण्याचे प्रामाणिक प्रयत्न होत नसल्याने नवीन संस्था उभारणीचे धाडस करायला कोणी तयार नाही. त्यामुळे या मतदारसंघाला अनुभवी, कणखर व विकासशील नेतृत्वाची गरज आहे. या समस्यांवर मात करून मतदारसंघ सर्वार्थाने संपन्न, सक्षम व वैभवशाली बनविण्यासाठीचे व्हिजन समोर ठेवून मी आतापर्यंत लढा देत आलो आहे व पुढेही माझा हा लढा सुरूच राहील. यावेळी नेतृत्वाची संधी मिळाल्यास नियोजनबद्ध रीत्या कामे करून मतदारसंघाचा कायापालट करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस व मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार तथा माजी आमदार दिलीप वाघ यांनी नजरकैद शी संवाद साधतांना स्पष्ट केले.
दिलीप वाघ म्हणाले की, विद्यार्थी दशेपासूनच नेतृत्वगुण विकसित झाले. नगराध्यक्ष पदापासून राजकीय कारकीर्द सुरू झाली असली तरी माझे पिताश्री शिक्षण, सहकार महर्षी व समाजवादी नेते कै. ओंकार आप्पा वाघ यांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीचा व नेतृत्वाचा जवळून अभ्यास केला आहे .समाजकारणाचे बाळकडू कुटुंबातच प्यायला मिळाल्याने राजकीय प्रवाहात आलो. 5 वेळा नगराध्यक्षपद भूषवले .कृषी उत्पन्न बाजार समिती ,शेतकरी सहकारी संघ, देखरेख संघ, पीटीसी शिक्षण संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थात नेतृत्व केले व करीत आहे. विविध पदांवर कार्य करताना काळ्या मातीशी व समाजाशी असलेली नाळ तुटू दिली नाही. अनेकदा पराभव ही पत्करावा लागला परंतु त्यामुळे कधी घरात बसून राहिलो नाही. ” यशाने माजू नका आणि अपयशाने खचू नका” या कै ओंकार आप्पांच्या व शरद पवार साहेबांच्या शिकवणुकी नुसार समाजकारणासाठी राजकारणात सक्रिय आहे. या निवडणुकीत महाआघाडी तर्फे निवडणुकीच्या रणांगणात लढत आहे .यात मतदार नक्कीच विश्वास टाकून विजयी करतील अशी मला खात्री नव्हे तर विश्वास आहे.
2014 च्या निवडणुकीत मतदार युतीच्या 15 लाख व अच्छे दिन च्या भूलथापांना बळी पडले. त्यावेळी माझाही निसटता पराभव झाला. युती शासनाच्या गेल्या 5 वर्षांच्या काळात जनतेला काय मिळाले? हा प्रश्न अनुत्तरित आहे .सरकारकडून काही मिळण्यापेक्षा जनतेला सुखी संपन्न जीवनाला जीवनाला मुकावे लागले आहे .हे आपले दुर्दैव म्हटले पाहिजे. शेती व शेतकरी यांचे प्रश्न सुटण्याऐवजी जास्त गुंतागुंतीचे झाले आहेत. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये, 2 कोटी तरुणांना नोकऱ्या ,शेती कर्जमाफी ,महिला सबलीकरण, सिंचन प्रकल्पाची उभारणी ,विद्यार्थी शिष्यवृत्ती व दुष्काळी अनुदान या सर्व मुद्द्यांना तिलांजली देण्यात आली .नोटबंदी व जीएसटी मुळे व्यापारी व उद्योजक बेहाल झाले .आर्थिक उलाढाल थंडावली, बेरोजगारांची भरती करण्याऐवजी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेते व पदाधिकाऱ्यांची भाजपात मेगा भरती झाली. शिक्षणाचे तीन तेरा झाले. न्याय मागणाऱ्या शिक्षक, शेतकरी, विद्यार्थी, महिला ,बेरोजगार यांच्यावर लाठीमार करून गुन्हे दाखल करण्यात आले .कोणाला काय मिळाले व कोण सुखी झाले ?या प्रश्नांची उत्तरे कोणालाच सापडत नाहीत.
गतकाळात आघाडी सरकारच्या काळात विकासकामांचा अश्वमेघ सर्वत्र धावताना दिसला .समाजातील प्रत्येक व्यक्तीला न्याय व स्वाभिमान देऊन त्यांना अभिमानाने उभे करण्याचे काम आघाडी सरकारने केले .सरसकट कर्जमाफी झाली. बेरोजगारांना रोजगार संधी उपलब्ध झाल्या.शेती व शेतकरी यांना मदतीचा हात मिळाला. महिलांना आरक्षणासह विविध सुविधा व संधी देऊन महिला सक्षमीकरणाचा हेतू साध्य झाला. रस्ते, वीज, पाणी, स्वच्छता, आरोग्य या संदर्भातील कामे पूर्णत्वास आली. आघाडीच्या काळात मंजूर झालेली कामे देखील गेल्या 5 वर्षात युती सरकारला पूर्ण करता आली नाहीत. पाचोरा -भडगाव मतदारसंघातही माझ्या काळातील मंजूर कामे आतापर्यंत पूर्ण केली जात असून त्याचे श्रेय आमदार घेतात याचे हसू येते व वाईटही वाटते.
राजकारणातील पितामह
ज्यांनी आतापर्यंतच्या राजकीय वाटचालीत यशस्वी होण्यासाठी शरद पवार साहेबांचे मार्गदर्शन घेतले तेच आता त्यांच्या विरोधात वक्तव्य करतात हा प्रकार सूर्यावर थुंकण्या सारखा आहे. खोटे नाटे आरोप, ईडी ची चौकशी लावून त्यांना बदनाम करण्याचे व वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांच्यातील जोश व उत्साह कमी करण्याचे विरोधकांचे प्रयत्न यशस्वी होण्यासारखे नाहीत. पवार साहेबांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना खंबीरपणे उभे केले. 71हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली ,नियमित कर्ज भरणाऱ्यांना बिनव्याजी कर्ज देऊन प्रोत्साहन दिले ,व्यापारी उद्योजकांना धीर व दिलासा देऊन आर्थिक संपन्नते कडे वाटचाल केली त्यामुळे युती सरकारमधील स्वार्थी राजकारण्यांनी त्यांची बरोबरी करण्याचा प्रयत्न करू नये .
विकासाचे व्हिजन=
पाचोरा -भडगाव मतदारसंघ सातत्याने दुष्काळाचे चटके सोसत आला आहे. नद्या व धरणे असूनही सिंचनाचे व पाणी टंचाईचे प्रश्न कायम आहेत. यांची सोडवणूक करण्यासाठी नारपार योजनेसह वाघूरचे पाणी मतदारसंघात आणून प्रकल्पांची उर्वरित कामे पूर्ण करू. सहकारी संस्थांना आर्थिक चक्रव्यूहातून बाहेर काढून सहकारातून समृद्धीचा उद्देश साध्य करण्याचे नियोजन आहे .रोजगार संधी उपलब्ध करणे ,प्राथमिक शाळांचा स्तर उंचावून अत्याधुनिक शिक्षणासाठी ग्रामीण भागातील शाळा सक्षम करणे, सरसकट कर्जमाफी ,गट शेतीला प्रोत्साहन, धार्मिक व ऐतिहासिक स्थळांचा विकास करून पर्यटन क्षेत्राला चालना मिळवून देणे ,कापूस, केळी, ऊस, मका उत्पादनावर आधारित विविध उद्योगांची मुहूर्तमेढ रोवणे,महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला सबलीकरणाचा उद्देश साध्य करणे, बेरोजगारांना व्यवसायासाठी कमी खर्चाची व्यापारी संकुले उपलब्ध करून कर्ज उपलब्ध करून देणे, बेरोजगारांना 5 हजार रुपये बेरोजगार भत्ता देणे ,महिला बचत गटांच्या उत्पादित मालासाठी बाजारपेठा उपलब्ध करून या मालाची उचल वाढवणे, सरसकट कर्जमाफी ,कृषी पंपांना पुरेशा दाबाने व पुर्णवेळ विज पुरवठा, रस्ते, वीज, पाणी,पथदिवे, साफसफाई, स्वच्छता, प्रमुख रस्ते व चौक यांचा विकास, ग्रामीण भागाला जोडणारे रस्ते व शेत रस्ते, माता-भगिनी व वृद्धांसाठी योग्य त्या सुख सुविधा,शांततामय व सुखी जीवन अशा कामां संदर्भातील विकासाचे व्हिजन समोर ठेवून त्यासंदर्भातील नियोजन केले असल्याचे स्पष्ट करत या व्हिजनच्या आधारे मतदार यावेळी नेतृत्वाची संधी देतील असा विश्वास दिलीप वाघ यांनी व्यक्त केला.