मुंबई : देशातील काही भागात कोरोना पुन्हा डोकं वर काढत आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आणि चौथ्या लाटेचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारने पाच राज्यांना पत्र लिहून अलर्ट दिला आहे. त्यात महाराष्ट्राचा देखील समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा मास्क सक्ती होणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना विचारले असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, केंद्राने पत्र पाठवले असून त्यात अन्य राज्यांचाही उल्लेख आहे. राज्यातील 135 रुग्णांपैकी 85 रुग्ण हे मुंबईतील आहेत. मुलांचे लसीकरण वाढले आहे. बुस्टर डोस संदर्भात केंद्राने निर्देश दिलेले नाहीयेत. कोणाला जर बुस्टर डोस घ्यायचा असेल तर खासगी रुग्णालयात घेऊ शकतात. कोरोना बाधितांची संख्या दिल्लीत वाढत आहे. मात्र, काळजी करण्याचे कारण नाहीये. मास्क बंधनकारक नाहीये.
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महाराष्ट्र, दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाणा, मिझोराम या राज्यांना पत्र लिहिलं आहे. या पाच राज्यांत पॉझिटिव्हिटी रेट वाढत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि योग्य त्या उपाययोजनेसाठी पावलं उचलण्याच्या सूचना केल्या आहेत.