जळगाव : मंत्री नवाब मलिक यांना बुधवारी ईडीने अटक केली. यामुळे राज्यातील महाविकास आघाडी कडून भाजपवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान, मलीक यांच्यावर असलेले आरोप, तपास यंत्रणा, पुरावे या घडामोडीतून जामिनाचा मार्ग कसा असेल? यावर जेष्ठ विधिज्ञ अॅड.उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘ईडीने प्रथमदर्शनी तपासात काही बाबी निष्पन्न झाल्यानंतरच त्यांना अटक केलेली असू शकते. मलिक यांची अटक कायदेशीर की बेकायदेशीर हे न्यायालयातच स्पष्ट होणार असून न्यायालय काय भूमिका घेते याकडे लक्ष लागलं आहे,’ असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे. जळगावात पत्रकारांशी उज्ज्वल निकम बोलत होते.
मलिक यांच्याकडून काही बाबींवर समाधानकारक खुलासा न आल्याने त्याच्या आधारावर मलिक यांच्या कोठडीची मागणी ईडीकडून होऊ शकते, अशी शक्यता निकम यांनी व्यक्त केली आहे.
दुसरीकडे, कुठलाच पुरावा नसताना मलिक यांच्यावर कारवाई केल्याबाबत आणि थेट तसा पुरावा नसतानाही राजकीय खेळीतून ही कारवाई केल्याचं मलिक यांच्या वकिलांकडून न्यायालयात सांगितलं जाईल आणि ते न्यायालयीन कोठडी मागतील व त्यानंतर मलिक यांना जामिनाचा मार्ग मोकळा होऊ शकतो, असंही उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, काही वेळापूर्वी नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आलं आहे. याप्रकरणी दोन्ही बाजू ऐकल्यानंतर कोर्टाकडून आपला निर्णय दिला जाणार आहे.