औरंगाबादः जिल्ह्यातील शरणापूरमध्ये एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शरणापूर शिवार परिसरात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रतिक आनंद भिसे (15), तिरुपती मारोती इंदलकर (15), शिवराज संजय पवार (17) असे मृत मुलांचे नाव आहेत. या घटनेमुळे शरणापूर परिसरावर शोककळा पसरली असून अग्निशमन दलाच्या जवानांनी या तिघांचेही मृतदेह बाहेर काढले.
शरणापूर शिवारात भांगसी गड पायथ्याशी नारायण वाघमारे यांचे शेततळे आहे. या तळ्यावर सायकलवर फिरण्यासाठी ही मुले गेली होती. तळ्यावर पोहोचल्यावर ते पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्याने या तिघांचाही बुडून मृत्यू झाला.
शरणापूर परिसरावर शोककळा
सकाळी शेततळ्यावर फिरण्यासाठी गेलेल्या मुलांचा या पद्धतीने करुण अंत होईल, याची कल्पानाही कुणी केली नसेल. मात्र शिवारात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. अग्निशामक दलाने या मुलांचे मृतदेह बाहेर काढले, त्यानंतर अवघा गाव सुन्न झाला.