- खडसे समर्थक भाजपवर प्रचंड नाराज

विधानसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी भाजपाने 1 ऑक्टोबर 2019 रोजी 125 उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली त्यात जेष्ठ नेते आ. एकनाथराव खडसे यांच्या नावाचा समावेश नसल्याने जीवाचे रान करून “कमळ” फुलविणारे नाथाभाऊ कोमेजले असावेत अशीच वागणूक भाजपकडून मिळाली असेच म्हणावे लागेल.
नाथाभाऊ यांना मुक्ताईनगर मतदार संघातून उमेदवारी मिळते की नाही असा प्रश्न त्यांच्या समर्थकांसह मुक्ताईनगरवासियांना पडला आहेे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षातून बहुतांश मातब्बरांनी नुकताच भाजपात प्रवेश केला असून त्यांच्या आगामी राजकीय भवितव्याचे भविष्यात काय होईल असा प्रश्न त्यांच्यासह समर्थक कार्यकर्त्यांना पडला आहे. जेष्ठ नेते आ. खडसे यांना उमेदवारी देण्यास पक्ष टाळा टाळ करीत आहे तर भाजपात आयात झालेल्यांच्या राजकीय कारर्कीदी विषयी आता त्यांना चिंता सतावीत आहे.
वास्तविक सुरूवातीच्या काळात राज्यात पक्ष वाढीसाठी बहुजनांचे नेते म्हणून ओळखले जाणारे स्व.प्रमोद महाजन, स्व. गोपीनाथ मुंडे, स्व. भाऊसाहेब पांडुरंग फुडंकर, वसंतराव भागवत, माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी जीवाचे रान करून कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करून राज्यभर पक्ष संघटन वाढविले. तसेच जळगाव जिल्हा हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा या ठिकाणी नाथाभाऊंनी स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका, कृउबा, विकासो आदी निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांना विजयी करून सत्ता स्थापन केली. तसेच जळगाव व रावेर लोकसभेच्या जागा देखील भाजपाच्या ताब्यात कायम ठेवण्यात नाथाभाऊंचा सिंहाचा वाटा आहे. पक्षासाठी जीवाचे रान करणार्या नाथाभाऊंना मुक्ताईनगर मतदार संघातून उमेदवारी देतांना वरिष्ठांनी जाहीर केलेल्या 125 उमेदवारांच्या नावाच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश नसल्याने त्यांना हा राजकीय धक्का मानला जात आहे. तसेच भाजप पक्ष राज्यभरात वाढविण्यासाठी आयुष्याची 40 वर्षे कठोर परिश्रम घेतलेल्या जेष्ठ नेत्याला जर विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारीची प्रतीक्षा करावी लागते याच्या वेदना निष्ठावान कार्यकर्त्यांना होत आहे. भाजप पक्षाच्या महत्वपूर्ण निर्णयात महत्वाची भुमिका जेष्ठ नेते आ. खडसे यांनी पार पाडली आहे. उमेदवारी देतांना देखील त्यांच्या शब्दाचा सन्मान केला जात असे. मुख्यमंत्री पदासाठी पात्र असतांना त्यांच्यावर अन्याय करण्यात आला होता. आता पुन्हा भाजपाने उमेदवारांच्या पहिल्या यादीत नाथा भाऊंचे नाव जाहीर न करण्याची राजकीय खेळी पक्षातील त्यांच्या विरोधकांनी केली असल्याची तीव्र भावना निष्ठावान कार्यकर्त्यांत व्यक्त होत आहे.
मागील विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजप – शिवसेना युती होऊ शकली नव्हती, तेव्हा युती तुटल्याची घोषणा करण्यासाठी भाजपाचे जेष्ठ नेते माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांना पुढे करून त्यांनीच युती होऊ दिली नाही असा संदेश पक्षातीलच त्यांच्या विरोधकांनी तेव्हा राज्यात फसरविल्याने शिवसेनेच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या रोषास आ. खडसे यांना अद्याप पर्यंत सामोरे जावे लागत आहे. प्रचाराच्या वेळी भाजपाची सत्ता आल्यावर बहुजनांचे नेते म्हणून ओळख असलेल्या आ. खडसे यांना मुख्यमंत्री केले जाईल असे भाषणां मधून भाजपाचे नेते जनतेला सांगत होते. मात्र सत्ता आल्या नंतर मुख्यमंत्री पदी कोणाची निवड करायची याचा निर्णय घेतांना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांवर संघाच्या जेष्ठ नेत्यांनी संघाशी जवळीक असलेल्या ना. देवेंद्र फडणवीस यांच्या नावासाठी आग्रह धरल्याने अखेर ना. फडणवीस यांची मुख्यमंत्री पदी वर्णी लागली. तेव्हा खान्देशातील भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांसह नागरीकांचा चांगलाच हिरमोड झाला होता. वास्तविक प्रचाराच्या वेळी नाथा भाऊंना मुख्यमंत्री पद देण्याचे प्रचार सभां मधून जाहीर केले असतांना सत्ता आल्यावर त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना भाऊंच्या समर्थकांत व्यक्त झाली होती. त्यानंतर मंत्री मंडळात त्यांना महसूल खात्यासह इतर खात्यांची जबाबदारी देऊन त्यांची नाराजी दुर करण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांनी केला होता. दुखावलेल्या भाऊंनी देखील फडणवीस सरकारला बहुतांश वेळी घरचा आहेर देऊन त्यांची गोची करण्याची संधी सोडली नव्हती. नाथाभाऊ मंत्री पदावर राहिल्यास सरकारला अडचणीत आणू शकतात अशी भिती काही विरोधकांच्या मनात वारंवार येत असल्यानेच भाऊंवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन ते दोषी नसल्याचे सिध्द झाल्यावर देखील भाऊंना पुन्हा मंत्री मंडळात स्थान देण्यात भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी टाळाटाळ करून त्यांचे राजकीय खच्चीकरण करण्याचा प्रयत्न शेवट पर्यंत केला. सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या वेळी रावेर मतदार संघातून खा. रक्षा खडसे यांना भाजपाने उमेदवारी जाहीर केल्यावर त्यांच्या प्रचारात सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार नाही अशी भुमिका स्थानिक नेत्यांनी घेतली होती. प्रचाराची धुरा नाथाभाऊंनी यशस्वीपणे राबवून खा. रक्षा खडसे यांना विजयी करून दुसर्यांदा लोकसभेत पाठविले.
भाजपा कडून नाथाभाऊंच्या संयमाची परीक्षा
गेल्या साडेतीन वर्षात नाथाभाऊ यांना विविध आरोपांमध्ये गुंतवल्या केले. पक्षाकडून देखील सतत अन्याय होत असल्याची भावना खडसे समर्थकांमध्ये आहेच. नाथाभाऊंनी साडेतीन वर्षात नाराजी व्यक्त करण्यापलीकडे काही केले नाही.ज्या पक्षात नाथाभाऊंचा शब्द अंतिम मानला जायचा तोच पक्ष आपल्या जेष्ठ नेत्याला अशी वागणूक देऊन उमेदवारी देण्यासाठी दुसऱ्या यादीची वाट पाहायला भाग पाडले या पेक्षा मोठे काय दुःख असू शकते.
काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षातून भाजपा मध्ये आयात झालेल्या उमेदवारांचे भवितव्य काय?
पक्षासाठी जीवाचे रान करून “कमळ” फुलविणाऱ्या जेष्ठ नेत्यांची पक्षात ही कदर केली जात असेल तर गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षातून मोठ्या प्रमाणात भाजपात आयात झालेल्या नेत्यांना किती किंमत होऊ शकते याचा अंदाज येऊ शकतो. यामुळे पक्षात आता नव्याने आलेल्या नेत्यांना चिंता सतावत आहे.
















सुंदर लिखाण आहे भाऊ आपलं