मुंबई: राज्यात कोरोनाने पुन्हा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. राज्यात काल, बुधवारी करोना रुग्णांची संख्या २६ हजारांपार नोंदवली गेली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लवकरच कठोर निर्बंध लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवीन निर्बंधांसंबंधी आज, गुरुवारी महत्वाची बैठक होऊ शकते आणि त्यात काही निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबईसह महाराष्ट्रातील करोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंधांबाबत आज, गुरुवारी महत्वाची बैठक होण्याची दाट शक्यता आहे. यात कार्यालयीन उपस्थिती आणि दुकाने, रेस्तराँच्या वेळांबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. लोकल प्रवासावरील निर्बंधांबाबतही काही निर्णय घेतला जाऊ शकतो. करोनाचा वाढता प्रादूर्भाव बघता, लवकरच नवीन कठोर निर्बंध लादले जाऊ शकतात, यात काहीच शंका नाही, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
राजेश टोपे काय म्हणाले होते?
राज्यातील करोना वाढती रुग्णसंख्या आणि ओमिक्रॉनचा वाढता प्रादूर्भाव याबाबत आढावा घेतल्यानंतर काल, बुधवारी राजेश टोपे यांनी माध्यमांना माहिती दिली होती. राज्यात तूर्तास संपूर्ण लॉकडाउन लागण्याची शक्यता नाही. मात्र, काही अनावश्यक सेवा आणि गर्दी टाळण्यासाठी निर्बंध लागू करण्याचा विचार आहे, असे टोपे म्हणाले होते. सध्याच्या घडीला शंभर टक्के लॉकडाउन लावण्याचा कोणताही विचार नाही. गरज भासल्यास काही निर्बंध लागू करण्यात येतील, असे सूतोवाच त्यांनी केले होते.
महाराष्ट्रात बुधवारी करोनाचे २६, ५३८ नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत करोनाचे १५,१६६ रुग्ण आढळले आहेत. ही आतापर्यंतची सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत हा आकडा ४३.७१ टक्क्यांनी वाढला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.