चेन्नई – भारताने उद्ध्वस्त केलेल्या बालाकोट येथील ’जैश ए मोहम्मद’च्या दहशतवाद्यांची ठिकाणे पाकिस्तानने पुन्हा एकदा सक्रिय केली आहेत. बालाकोटमध्ये असलेले हे दहशतवादी पुढेही जावू शकतात. कमीत कमी 500 दहशतवादी पीओकेमधून जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी आज चेन्नईत बोलताना दिली. इस्लामचा गैरवापर केला जात असून धर्म गुरुंनी इस्लामचा खरा अर्थ लोकांना सांगायला हवा, असेही रावत म्हणाले.
जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर पाकिस्तानने उघडपणे म्हटलेय की, आम्ही दहशतवादी पाठवू. म्हणून पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन केले जात आहे. दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करता यावा यासाठी पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन केले जाते. आम्ही बालाकोटपेक्षा अधिक पुढे जाऊ शकतो, असा थेट इशारा लष्करप्रमुखांनी पाकिस्तानला दिला आहे. पाकिस्तानच्या बालाकोटमधील दहशतवादी शिबीरे पुन्हा एकदा सक्रिय झाली आहेत. ही शिबीरे नुकतीच सुरू करण्यात आली आहेत. तसेच पीओकेमधून 500 दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहे, असे बिपिन रावत म्हणाले.
घुसखोरी करण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना रोखण्यासठी भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज आहेत. घुसखोरीचे अनेक प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडले आहेत, असेही लष्करप्रमुख म्हणाले. भारतीय वायुदलाच्या विमानांनी पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळांवर बॉम्ब हल्ला केला होता. त्यानंतर अनेक दिवस जैशचा हा अड्डा बंद झाला होता.