अमरावती : अमरावती हिंसाचाराच्या घटनेचा आढावा घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज अमरावतीत आले आहेत. व्यापाऱ्यांच्या भेटीगाठीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.
‘१२ तारखेच्या घटनेला टार्गेट केलं जात असून आदल्या दिवशी झालेला घटनाक्रम दुर्लक्षित करायचा आणि केवळ दुसऱ्या दिवशीच्या घटनांवर केवळ लक्ष केंद्रीत करायचे हे योग्य नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात येत आहे. टार्गेट करून, याद्या तयार करून सूडबुद्धीने कारवाई करण्यात येत आहे,’ असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
जर खोट्या गुन्ह्यात अडकवायचे असेल तर आमचे सारे कार्यकर्ते एकत्र जेलभरो आंदोलन करतील, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसंच, त्रिपुरा येथे जी घटना घडली नाही, त्यावर १२ तारखेचा मोर्चा निघाला. हे मोर्चे मोठ्या षडयंत्राचा भाग होता. मात्र जणू १२ तारखेला काही घडलेच नाही, असे सांगण्याचा राज्य सरकार आणि पोलिसांचा प्रयत्न आहे. संपूर्ण पोलिस यंत्रणा प्रचंड दबावात काम करते आहे,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.