मुंबई प्रतिनिधी | राज्यात पहिल्या टप्प्यातील २०८८ सहायक प्राध्यापक आणि प्राचार्यांच्या ३७० रिक्त पद भरतीला मान्यता देण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी दिली. राज्यातील प्राध्यापक भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करा, अशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून करण्यात येत होती. त्यासाठी आंदोलनदेखील करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, असे उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. १ ऑक्टोबर २०२० च्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या आधारे विभागाने सहायक प्राध्यापकांची पदे भरण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर केला होता. परंतु २०८८ पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय लवकरच निर्गमित होईल. ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे होणार असून यशस्वी उमेदवारांची नियुक्ती सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात करण्यात येणार अाहे.
{ उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय व अनुदानित महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर पदांसाठी घड्याळी तासिका तत्त्वावर कार्यरत असलेल्या कनिष्ठ अधिव्याख्यात्यांच्या मानधनाच्या दरात सर्वसाधारण २५ टक्के एवढी भरीव वाढ करण्यात आली असून ही वाढ केवळ ३ वर्षाच्या कालावधीत करण्यात आलेली आहे. अशासकीय अनुदानित महाविद्यालयात सन २०१८-१९ मध्ये एकूण ९,३३१, २०१९-२० मध्ये ७,२१२ व २०२०-२१ मध्ये एकूण २,२६४ याप्रमाणे तासिका तत्त्वावर अध्यापक कार्यरत होते.
{ २३ ऑक्टोबर १९९२ ते दि. ३ एप्रिल २००० या कालावधीत नियुक्त बिगर नेट/सेट अध्यापकांना त्यांच्या मूळ नियुक्तीचा दिनांक ग्राह्य धरून तत्कालीन प्रचलित धोरणानुसार जुनी सेवानिवृत्ती वेतन अनुज्ञेय करण्याबाबतचा २९ ऑक्टोबर २०२१ रोजी निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे सर्वसाधारण ४,१३३ अध्यापकांना जुन्या सेवानिवृत्ती योजनेचा लाभ होणार असल्याचेही सामंत यांनी या वेळी सांगितले.