जळगाव प्रतिनिधी | धावत्या रेल्वेतून पडल्यामुळे औरंगाबाद येथील तरुणाचा मृत्यू झाला. खिशात मिळून आलेल्या एका फोन नंबरवरून पोलिसांनी मृत तरुणाची ओळख पटवली. ही घटना १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता सुरत रेल्वेलाइनवरील मालधक्का परिसरात घडली.
किशाेर रघुनाथ खोतकर (वय ३७, रा. मुकुंदवाडी, ता. औरंगाबाद) असे मृत तरुणाचे नाव आहे. रेल्वेने प्रवास करीत असताना १७ रोजी सायंकाळी किशोर धावत्या रेल्वेतून पडल्याचा संशय आहे. त्याचा मृतदेह आढळून आल्यानंतर तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक नयन पाटील, विश्वनाथ गायकवाड यांनी घटनास्थळी पंचानामा केला.
किशोरच्या खिशातून मोबाइल नंबर लिहिलेला एक कागद मिळून आला. पोलिसांनी या नंबरवर फोन केला असता तो मृत किशोरचा भाचा पवन याचा असल्याचे निष्पन्न झाले. पवनला मृतदेहाचे फोटो पाठवल्यानंतर त्याने ओळख पटवली. मृतदेह मामा किशोर खोतकर याचा असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानुसार सोमवारी सकाळी पवनसह किशोरचे कुटंुबीय जळगावात आले होते. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. मृत किशोर हा सेन्ट्रिंग कामाच्या निमित्ताने वर्षभर वेगवेगळ्या शहरांमध्ये राहत असे. औरंगाबाद येथे घरी आल्यानंतर पाच-सहा दिवसांत पुन्हा नवीन शहरात जाऊन तो राहायचा. १३ रोजी तो कामाच्या शोधात कल्याणला गेला होता.
तेथे काम मिळत नसल्याचे कदाचित तो जळगाव, सुरत या शहरात येणार असताना हा अपघात झाला असेल अशी शक्यता कुटंुबीयांना व्यक्त केली आहे. त्यानुसार पोलिसांनी त्यांचा जबाब घेतला आहे. मृत किशोर हा पत्नीपासून विभक्त राहत होता. त्याच्या पश्चात दोन भाऊ, वहिनी, तीन मुले असा परिवार आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उपनिरीक्षक पाटील, गायकवाड तपास करीत आहे.














