मुंबईः राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट होत आहे. त्यात पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कालच राज्यातील करोना निर्बंध शिथिल करण्याबाबत संकेत दिले होते. दिवाळीच्या मुहूर्तावर राज्यातील निर्बंधांबाबत अटी नियम शिथिल होण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज एक मोठी बैठक होणार आहे.
सध्या दुकानं, बार, रेस्टॉरंट आणि मॉल्सच्या निर्बंधात काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. लशीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मॉलमध्ये प्रवेश देण्यात येत आहे. त्याप्रमाणेच लशीचा एक डोस घेतलेल्या लोकांनाही निर्बंधात सूट देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली करोना टास्क फोर्ससोबत आज बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला टास्क फोर्सचे वरिष्ठ डॉक्टर व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर करोना नियमांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
सण- समारंभाच्या काळात लोक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी बाहेर पडतात. मागील वर्षी करोना संकटामुळं ऐन दिवाळीत कठोर निर्बंधांमुळं व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला होता. त्यामुळं यंदा निर्बंधात शिथिलता द्यावी, अशी व्यापाऱ्यांची मानसिकता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दुकानं, बार, रेस्टॉरंट, मॉल्सच्या वेळेची मर्यादा वाढवली जाण्याची शक्यता आहे. त्याबाबतचा निर्णय काही दिवसांत जारी होण्याची शक्यता आहे. सरकारकडून एक – दोन दिवसांत अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.