लखनऊ : लखीमपूर खिरीच्या घटनेमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. लखीमपूर खेरी हिंसा प्रकरणानंतर आता यूपीमध्ये समाजवादी पार्टीने कडक भूमिका घेतली आहे. सपा अध्यक्ष अखिलेश यादव हे ठिय्या आंदोलनावर बसले आहे. मात्र त्यांच्या आंदोलनस्थळापासून काहीच अंतरावर एका पोलिसांच्या जिप्सी व्हॅनला आग लावण्यात आली आहे. हिंसाचार जास्त वाढू नये यासाठी पोलिसांनी ठिय्या आंदोलनाला बसलेल्या अखिलेश यादव यांना ताब्यात घेतले आहे.
लखीमपूर खेरीच्या शेतकरी आंदोलनात 2 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर काही शेतकरी जखमी झाले आहे, मंत्र्यांच्याच ताफ्यातील गाड्यांनी शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप आता विरोधक करत आहेत. शेतकऱ्यांच्या भेटीसाठी निघालेल्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अटक केल्याचे माहिती युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही यांनी ट्विटरवरुन दिली आहे. प्रियंका गांधी यांच्यानंतर आता अखिलेश यादव यांनी देखील शेतकऱ्यांची भेट घेणार असल्याची घोषणा केल्यानंतर पोलिसांनी त्यांना स्थानबद्द करण्याचा प्रयत्न केला आहे. अखिलेश यांच्या निवासस्थानाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
अखिलेश यादव यांना रोखण्यात आल्यानंतर त्यांनी आपल्या घराबाहेर धरणे आंदोलन सुरू केले. त्यानंतर पोलिसांनी अखिलेश यांना ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अखिलेश यादव लखनऊमध्ये त्यांच्या घराजवळ आंदोलनासाठी बसले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. अखिलेश यादव लखीमपूर खिरीला जात असताना त्यांना यूपी सरकारच्या आदेशावर पोलिसांनी रोखले, असा दावा पक्षाने केला. त्यानंतर शेकडो सपा समर्थक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. अखिलेश यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांच्या वाहनाला आग लावण्याची घटना घडली आहे. ही घटना घटनास्थळापासून काही मीटर अंतरावर घडली आहे.