ग्वालियर: मध्य प्रदेशात बस आणि कंटेनर एकमेकांना भिडल्यामुळे झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना भिंड – ग्वालियर महामार्गावर आज सकाळी घडली. तर या अपघातात १५ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनीही या घटनेची दखल घेतलीय.
गोहद स्टेशनच्या डांग बिरखडी परिसराजवळ हा अपघात घडलाय. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दु:ख व्यक्त केलंय. ‘मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भिंड जिल्ह्यातील गोहद महामार्गवर झालेल्या रस्ते दुर्घटनेत जीव गमावणाऱ्या सात जणांच्या अकाली निधनावर शोक व्यक्त केला आहे. कुटुंबांना दु:ख सहन करण्याची शक्ती देण्याची प्रार्थना त्यांनी ईश्वराकडे केली आहे’, असं ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलंय.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या अपघातात प्राण गमावणाऱ्या तसंच जखमींच्या कुटुंबांना योग्य मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. ‘रेड क्रॉस’द्वारे जखमींना ५० हजार रुपयांची त्वरीत मदत पुरवण्यात येणार आहे.